देशातील 1 लाख शाळा पडल्या बंद; 7,993 शाळेत एकाही विद्यार्थी नाही, विद्यार्थी प्रवेशाची संख्याही घटली

गेल्या दशकात 1 लाखांहून अधिक शाळा बंद झाल्या असून देशातील 7 हजार 993 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे 

देशातील 1 लाख शाळा पडल्या बंद; 7,993 शाळेत एकाही विद्यार्थी नाही, विद्यार्थी प्रवेशाची संख्याही घटली
An abandoned government school highlights India’s growing education crisis, where thousands of schools face zero student enrollment and lack basic facilities.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशाच्या शिक्षण व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगणारी धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. केंद्र शासनाने स्थापन केलेल्या नीती आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवरून देशाच्या शिक्षणाचे भयान वास्तव कागदावर आले आहे. केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाटावी,असे चित्र या अहवालातून उलगडले आहे. तसेच अजूनही देशातील अनेक शाळांमध्ये वीज, टॉयलेट्स, कम्प्युटर लॅब, इंटरनेट सुविधाची सुविधा सुद्धा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या दशकात 1 लाखांहून अधिक शाळा बंद झाल्या असून देशातील 7 हजार 993 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे 

निती आयोगाच्या अहवालानुसार देशातील शाळांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. 2014-15 मध्ये देशात 15.16 लाख शाळा होत्या. 2017- 18 मध्ये देशातील शाळांची संख्या 15.58 लाखापर्यंत पोहोचली. परंतु 2024- 25 मध्ये या शाळांमध्ये कमालीची घट झाली असून देशात आता 14.71 लाख शाळा उरल्या आहेत.

देशातील व्यवस्थापन निहाय शाळांची आकडेवारी विचारात घेतली तर 2014- 5 मध्ये देशात 11.7 लाख शासकीय शाळा होत्या. तर 0. 83 लाख शासकीय अनुदानित शाळा होत्या. तर खाजगी विनाअनुदानित शाळांची संख्या 2.88 लाख एवढी होती. मात्र 2024- 25 मध्ये खाजगी विनाअनुदानित शाळांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली. 2024 25 मध्ये खाजगी विनाअनुदानित शाळांची संख्या 3.39 लाख पर्यंत वाढली. तर 2024-25 मध्ये शासकीय शाळांची संख्या 11.7 लाखावरून 10.13 लाखापर्यंत कमी झाली. म्हणजेच गेल्या दहा वर्षात 1 लाखाहून अधिक सरकारी शाळा बंद झाल्या. 

निती आयोगाच्या आकडेवारीनुसार 2014-15 मध्ये 26.95 कोटी विद्यार्थी शाळेत प्रवेश घेत होते. परंतु 2024-25 पर्यंत हा आकडा कमी होऊन 24.69 कोटी एवढा झाला. 2014 15 मध्ये शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 14.66 करोड एवढी होती. 2024-25 मध्ये शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरून 12.15 कोटी एवढी झाली. याउलट खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. 2014 15 मध्ये खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 8.56 कोटी एवढी होती. हीच संख्या 2024- 25 मध्ये 9.58 कोटीपर्यंत एवढी वाढली. 

नीती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार ग्रॉस एनरोलमेंट रेशो चिंताजनक आहे. प्रायमरी एज्युकेशनचा जीईआर 90.9 असून हाच जीईआर हायर सेकंडरीपर्यंत 58.4 एवढा होतो. त्यामुळे ही बाब चिंता जनक आहे. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत असून अप्पर प्रायमरी मध्ये ड्रॉप आउट चे प्रमाण 3.5% एवढे असून सेकंडरीपर्यंत हे प्रमाण 11. 5% पर्यंत जाते.

देशातील 7 हजार 993 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. तर शिक्षक आहे मात्र एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही अशा शाळांची संख्या 20 हजार 817 एवढी आहे.तर एक शिक्षकी शाळांची संख्या 1 लाख 4 हजार 125 एवढी आहे. गुणवत्तेचा विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांना वाचन, गणितीय बेरीज वजाबाकी आधी गोष्टी येत नसल्याचे नीती आयोगाच्या अहवालातून समोर आले आहे.