महापुरुषांचे विचार जागतिक पातळीवर घेऊन जाण्याची आवश्यकता: डॉ. शैलेंद्र देवळाणकर

शिक्षणाचा केंद्रबिंदू कौशल्य शिक्षण असणार नाही, तो पर्यंत भारताला विकासाची उद्दिष्टे गाठता येणार नाहीत. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे १०० वर्षापूर्वी सांगून ठेवले होते.

महापुरुषांचे विचार जागतिक पातळीवर घेऊन जाण्याची आवश्यकता:  डॉ. शैलेंद्र देवळाणकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष मेकर्स ऑफ मॉर्डन इंडिया अर्थात आधुनिक भारताचे जनक आहेत. आधुनिक भारताच्या विकासाचा पाया या महापुरुषांनी रचलेला आहे. त्यांच्या विचाराच्या आधारावर लोकशाही समृद्ध बनली आहे. जगामध्ये असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता या महापुरुषांच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे महापुरुषांना या भारतापुरते मर्यादित न ठेवता जागतिक पातळीवर त्याचे विचार घेऊन जाणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

मॉर्डन एज्युकेशन सोसायटी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.शैलेंद्र देवळाणकर बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ.सचिन सानप,नेस वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.ऋषाली रणधीर, प्राचार्य डॉ. बी. बी. बहुले आदी उपस्थित होते.

देवळाणकर म्हणाले, भारताला विकसित राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर महापुरुषाचे साहित्य व त्यांच्या विचारांचे स्मरण आपल्याला करावे लागेल. विशेष करून तरुण पिढीला महापुरुषांच्या कार्याचे स्मरण होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत देश विविधतेने नटलेला असूनही हा देश एकसंघ राहिला.  देशाचे सार्वभौमत्व व स्वतंत्र टिकून राहिले त्याचे कारण येथील महापुरुषांचे कार्य आणि त्याच्या विचारात आहे.

विकसित भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी महापुरुषांनी २०० ते ३०० विषयापूर्वी सांगून ठेवल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे लोकशाहीकरण झाले पहिजे,अशी मागणी अनेक वर्षापूर्वी केली होती. शिक्षणाचा केंद्रबिंदू कौशल्य शिक्षण असणार नाही, तो पर्यंत भारताला विकासाची उद्दिष्टे गाठता येणार नाहीत. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे १०० वर्षापूर्वी सांगून ठेवले होते,असेही देवळाणकर म्हणाले. 

डॉ.सचिन सानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन जाण्यासाठी संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचा आढावा यावेळी सानप यांनी घेतला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ.ऋषाली रणधीर यांनी 'मी सावित्रीबाई फुले बोलतेय' हा एकपात्री प्रयोग सादर केला. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रणधीर यांनी केले.