परीक्षेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी टीईटी परीक्षा पुढे ढकलली; मंत्री दादा भुसे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासातून जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी राज्यभरातील १ हजात २८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींची कोणतीही हयगय न करता कठोर कारवाई केली जाईल, विद्यार्थ्यांचे हित आणि परीक्षेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर नव्या तारखेची घोषणा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
दादा भुसे म्हणाले, भिवंडी येथे काही संशयितांकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी धाड टाकून संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीत जप्त प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न हे नियोजित टीईटी परीक्षेच्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासातून जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली.
शासनाची यंत्रणा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी कटिबद्ध असून, या प्रकरणातील संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरू असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले.दारम्यान विविध क्षेत्रातून पेपर फूटीवर टीका केली जात आहे.
________________________________________________
NEET पेपर फुटीनंतर महाराष्ट्रात TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली शैक्षणिक वाटचालीला गालबोट लागले आहे. सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे व शासनाने घेतलेल्या बोटचेपी धोरणामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांना सुद्धा TET परीक्षा द्यावी लागत आहे. राज्यातील 6 लाख 125 विद्यार्थ्यांनी TET परीक्षेची तयारी केली. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने शिक्षक व इतर उमेदवारांमध्ये संतापाची लाट आहे. मागीलवर्षी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात पेपर फुटीची घटना घडल्याची चर्चा झाली होती. मात्र, ही घटना दडपण्यात आली. राज्यात अनेक कर्मचारी भरतीच्या संदर्भाने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पेपर फोडले जातात. ज्या परीक्षेवर लाखो विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे, अशा परीक्षा नीटपणे आणि पारदर्शकपणे घेणे गरजेचे आहे. परीक्षाच योग्य पद्धतीने घेता येत नसेल तर TET परीक्षा सक्तीची अट रद्द करावी.
शिवाजी खांडेकर, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
____________________________________________
टीईटी पेपर फुटी मागे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे . याचे प्रमुख कारणे शिक्षण हक्क कायद्यानुसार डीएड किंवा बीएड पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, केवळ नवीन भरतीसाठीच नाही, तर अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक भरती ,पवित्र पोर्टल ,शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी साठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या सर्व प्रक्रिया शिक्षण विभागाच्या प्रमुख कार्यालयांमध्ये पार पाडल्या जातात आणि त्यावर उपसंचालक व त्यावरील अधिकाऱ्यांचा कंट्रोल असतो.येथे चालत आलेल्या गैरव्यवहार ,भ्रष्टाचार वर नियंत्रण मिळवण्यासाठी टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येते .अशावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत होणाऱ्या टीईटी पेपरफुटीचा फायदा हा एक उमेदवाराला आणि दुसरा या प्रक्रियेतीस अधिकाऱ्यांना होणार आहे.
या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने टीईटी पेपरफुटी चा तपास हा सीआयडीकडे सोपवला पाहिजे.
- कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना, महाराष्ट्र राज्य