आणखी एक परीक्षा रद्द! नवी मुंबई महानगरपालिकेने परीक्षा पुढे ढकलली; १९ हजार उमेदवारांना ऐनवेळी धक्का
नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. स्थानिक प्रकल्पबाधित व्यक्तींच्या हितरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले. सध्यातरी फक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झालेली नाही. आवश्यक दुरुस्त्या आणि चर्चेनंतर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नवी मुंबई महानगरपालिकेतील (NMMC) १३२ रिक्त पदांसाठी (132 vacancies) नियोजित भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात (Postponement of the recruitment exam) आली आहे. प्रकल्पग्रस्त (Project-affected candidate) उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी पालिका सभागृहाने २१ जुलै व २२ जुलै रोजी होणारी परीक्षा स्थगित केली आहे. या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील १९ हजार २२० उमेदवारांच्या (19,220 candidates) तयारीवर पाणी पडले असून त्यांना धक्का बसला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील १३२ विविध पदांसाठी थेट सेवा भरती प्रक्रिया राबवली होती. या ऑनलाइन भरतीला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली होती, परंतु सभागृहाच्या निर्णयामुळे परीक्षा स्थगित झाली.
नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. स्थानिक प्रकल्पबाधित व्यक्तींच्या हितरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले. सध्यातरी फक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झालेली नाही. आवश्यक दुरुस्त्या आणि चर्चेनंतर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.
या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक उमेदवारांनी परीक्षेच्या तयारीसाठी अनेक महिने मेहनत घेतली होती. नवी मुंबई महानगरपालिकेतील नोकरीची संधी मिळविण्यासाठी आलेल्या या भरतीत राज्यातील विविध भागांतून उमेदवार सहभागी होणार होते. आता नवीन तारखांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाने स्थानीय उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, परीक्षेच्या स्थगितीमुळे उमेदवारांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. प्रशासन लवकरात लवकर नवीन वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करत आहेत.