उद्यापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार सुरू
राज्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा / स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न सर्व शाखांमधील अकरावी प्रवेशाकरीता अशी प्रक्रिया अनिवार्य आहे. सत्र २०२५-२६ पासून एचएसव्हीसी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नुकताच इयत्ता बारावीचा निकाल (12th result) जाहीर झाला असून आता दहावीचा निकाल (10th result )कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. १५ मे पर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश (11th admission process) घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (online admission process) गुणवत्तेनुसार उद्या दि. ८ मे पासून सुरु होणार आहे.
शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत ही प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारेच राबवावी. अन्य मार्गाने एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाही, असे आदेश सरकारने काढले आहेत.
राज्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा / स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न सर्व शाखांमधील अकरावी प्रवेशाकरीता अशी प्रक्रिया अनिवार्य आहे. सत्र २०२५-२६ पासून एचएसव्हीसी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
अशी असेल अकरावी प्रवेश प्रक्रिया
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करणे आवश्यक असणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास त्यांच्यावर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दहावीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास प्रवेश प्रकियेतून २०२५-२६ या वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे. दहावीचा ऑनलाइन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाकरीता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी एकच प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांपैकी प्रत्येक फेरीत एका शाखेच्या निवडीची सोय असणार आहे. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असून कोणत्याही एका शाखेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
कस आहे संपूर्ण वेळापत्रक?
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर आठ तारखेपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून 8 मे पासून ते 15 मे 2025 पर्यंत शाळा, महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्यावत करण्यासाठी मुदत दिली गेली आहे.
तसेच, उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करण्यासाठी 8 ते 16 मे असा कालावधी देण्यात आलाय अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ही सर्व प्रोफाइल रेडी झाल्यानंतर अकरावी मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार केले जाणार आहे आणि यासाठी 19 तारखेपासून सुरुवात होणार आहे.
19 पासून ते 28 मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. तसेच, विद्यार्थ्यांना 19 ते 28 मे या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यापुर्वी शुन्य फेरी – व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करता येईल अशीही माहिती देण्यात आली आहे. मात्र अजून शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही पण हे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्व फेरीमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू होतील. सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू केले जातील असे बोलले जात असून 11 ऑगस्ट 2025 पासून अकरावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.