लॉ अर्थात विधी पदवी शिक्षणाचे नियम झाले कडक

या नियमाचे कोणतेही उल्लंघन आढळल्यास, विद्यार्थ्याला त्याची अंतिम मार्कशीट/कायद्याची पदवी मिळणार नाही.

लॉ अर्थात विधी पदवी शिक्षणाचे नियम झाले कडक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लॉ करण्याचा विचार करत असलेल्या किंवा LLB, LLM सारख्या कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India) भारतात कायद्याच्या शिक्षणासाठी नवीन नियम लागू (New rules apply) केले आहेत. हे नियम इतके कडक आहेत की एक चूक सुद्धा तुमची कायद्याची पदवी काढून घेऊ शकते. 

बार कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, सर्वात मोठी गोष्ट गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी बीसीआयने (BCI) गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे अनिवार्य (Criminal background check mandatory)केले आहे. त्यांचा कधी गुन्हेगारी प्रकरणात सहभाग आहे की नाही हे विद्यार्थ्यांना (Students) सांगावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या एफआयआर, गुन्ह्यापासून पुराव्यापर्यंत, ताब्यात घेणे, अटक करणे किंवा सुटकेपर्यंतची माहिती द्यावी लागेल. तसे न केल्यास, संबधित विद्यार्थ्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्याची पदवी देखील रोखली जाऊ शकते.

तसेच विधी शिक्षण नियमांनुसार, कायद्याचे विद्यार्थी एका वेळी एकापेक्षा जास्त नियमित पदवी अभ्यासक्रम करू शकत नाहीत. बीसीआयने म्हटले आहे की, जर एखादा विद्यार्थी एलएलबीसह दुसरी नियमित पदवी करत असेल तर त्याला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. या नियमाचे कोणतेही उल्लंघन आढळल्यास, विद्यार्थ्याला त्याची अंतिम मार्कशीट/कायद्याची पदवी मिळणार नाही. 

कायद्याचे शिक्षण घेत असताना, विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा सेवेत सहभागी होऊ शकत नाही. उमेदवाराला असा कोणताही अभ्यासक्रम घ्यायचा असल्यास त्याला प्रथम त्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवावे लागेल. 

बीसीआयच्या कायदेशीर शिक्षणाच्या नियम क्रमांक १२ नुसार, विद्यार्थ्यांना वर्गात पूर्ण उपस्थिती राखावी लागेल. यावर लक्ष ठेवण्यासाठी बार कौन्सिल बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्हीची मदत घेणार आहे. यासंदर्भात कौन्सिल कडून  सर्व विधी महाविद्यालये आणि विधी विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या आहेत.