पहिलीपासून दोन भाषांचा आदेश प्रसिद्ध करण्याची राज ठाकरेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

आपल्याच निर्णयावर घुमजाव करून सरकारने हिंदी भाषेची पुन्हा सक्ती केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी पत्रात दिला आहे.

पहिलीपासून दोन भाषांचा आदेश प्रसिद्ध करण्याची राज ठाकरेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा (Maharashtra State Board of Education) अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जातील, (Only two languages, Marathi and English, will be taught from the first grade.) या निर्णयाचा लेखी आदेश (Written order) लवकरात लवकर काढावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (School Education Minister Dadaji Bhuse) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यासंदर्भात राज ठाकरे यांनी भुसे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात मनसेने आवाज उठवला त्यानंतर सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित करण्यात आले.  

मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही असा सवालही त्यांनी भुसे यांना केला आहे.   

याबरोबरच आपल्याच निर्णयावर घुमजाव करून सरकारने हिंदी भाषेची पुन्हा सक्ती केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी पत्रात दिला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील (मराठी आणि इंग्रजी) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे.