NEET नंतर UGC-NET पेपर लीकचा धक्कादायक आरोप; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. नीट परीक्षेनंतर आता नेट परीक्षेतही पेपर लीक झाल्याचा दावा करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचे म्हटले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशातील परीक्षा घोटाळ्यांची मालिका सुरू असतानाच आता यूजीसी-नेट परीक्षा पेपरफुटी बाबत (UGC-NET Exam) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून मोदी सरकारवर (Narendra Modi Government) निशाणा साधला आहे. नीट परीक्षेनंतर आता नेट परीक्षेतही पेपर लीक (Net Paper Leak) झाल्याचा दावा करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचे म्हटले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान करणाऱ्या या प्रकाराबाबत राहुल गांधी यांनी पाच गंभीर मुद्दे उपस्थित (5 serious issues raised) केले आहेत.
राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार, परीक्षेच्या काही तास आधीच १०० पानांची एक संशयास्पद पीडीएफ प्रसारित झाली. ही पीडीएफ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अंतर्गत प्रश्नपत्रिका सेटिंगशी संबंधित होती. या लीक झालेल्या पीडीएफमधील तब्बल ९० प्रश्न समाजशास्त्र विषयाच्या मुख्य प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले. अत्यंत गोपनीय माहिती परीक्षेच्या आधी बाहेर पडणे हे मोठे सुरक्षा अपयश दर्शवते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, लीक झालेली प्रश्नपत्रिका बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांमध्ये २ लाख २५ हजार रुपयांना विकली गेल्याचा आरोप आहे. याच नेटवर्कने आगामी सीएसआयआर-नेट, एचटीईटी आणि एडीए सारख्या परीक्षांचे पेपरही लीक करण्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. एकामागून एक परीक्षा घोटाळे समोर येत असताना सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे
.राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे रात्रंदिवस कष्ट घेतले, त्यांचे स्वप्न आणि मेहनत या सरकारसाठी कवडीमोल आहे. पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांकडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जाणार नाही किंवा निष्पक्ष चौकशी होणार नाही, अशी भीती व्यक्त करत त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार रुजल्याचे चित्र उभे केले आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी यांनी देशभरातील तरुण पिढीला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सामूहिक आवाज हाच बदल घडवून आणणारे एकमेव हत्यार असल्याचे सांगत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील क्रांतीसाठी युवा शक्तीला पुढे येण्याचे आवाहन केले. सध्या या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू असून, एनटीए आणि केंद्र सरकारकडून याबाबत लवकरच स्पष्टीकरण अपेक्षित आहे.