विद्यापीठ 'या' कॉलेजचे प्रवेश  रोखणार:परिपत्रक केले प्रसिद्ध 

ज्या महाविद्यालयांनी स्थानांतरासाठी विद्यापीठाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता तसेच शासनाची परवानगी न घेता परस्पर महाविद्यालय स्थलांतरित केले आहेत, अशा महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष 2026-2017 पासून विद्यार्थी प्रवेशित करता येणार नाहीत.

विद्यापीठ 'या' कॉलेजचे प्रवेश  रोखणार:परिपत्रक केले प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या काही शैक्षणिक संस्थांनी शासनाकडून कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी दिलेल्या जागे ऐवजी शासनाची अथवा विद्यापीठाची परवानगी न घेता इतरत्र कॉलेज सुरू केले असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा महाविद्यालयांचे 2026- 27 पासूनचे प्रवेश थांबविले जाणार आहेत, असे पत्रक विद्यापीठाच्या संलग्नता कक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 118 मधील तरतुदीनुसार राज्य शासनाची सहमती घेतल्यानंतर विद्यापीठाकडून कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. तसेच कलम 108 (एक) (झ) मधील तरतुदीनुसार विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय व्यवस्थापनामध्ये कोणताही बदल किंवा त्याचे हस्तांतरण किंवा महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या स्थानात बदल करण्यात येणार नाही,असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

महाविद्यालय स्थानांतरासाठी विद्यापीठाकडे रीतसर अर्ज करून विद्यापीठाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्यानंतर शासनाची परवानगी घेऊन विद्यापीठ कायद्यामधील तरतुदीस अनुसरून स्थानांतर करणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयांनी स्थानांतरासाठी विद्यापीठाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता तसेच शासनाची परवानगी न घेता परस्पर महाविद्यालय स्थलांतरित केले आहेत, अशा महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष 2026-2017 पासून विद्यार्थी प्रवेशित करता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

विद्यापीठ व राज्य शासनाकडून महाविद्यालयांना मान्यता देताना बृहत आराखडा विचारात घेतला जातो. परिसरात असणाऱ्या महाविद्यालयांचा विचार करून मगच संबंधित भागात नवीन महाविद्यालय दिले जाते. एखाद्या शैक्षणिक संस्थेने परस्पर महाविद्यालयाची जागा बदलल्यास दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे परस्पर महाविद्यालयाचे स्थलांतर करणे अयोग्य ठरते. शासनाने अध्यादेश प्रसिद्ध करून ठराविक जागेमध्ये महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेले असते. मात्र, काही संस्था परस्पर महाविद्यालयाची जागा बदलत असल्याचे विद्यापीठाचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.