जळगावात धक्कादायक घटना! कॉलेज चालवायचे असल्यास १५-२० लाख खंडणी द्या; शिक्षकांवर हल्ला

जळगाव शहरातील एमकेडी कॉलेजमध्ये खंडणीची मागणी करत धमकी देण्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या फी परतावा आंदोलनादरम्यान काही जणांनी संस्थाचालकांकडे १५ ते २० लाख रुपयांची खंडणी मागितली.

जळगावात धक्कादायक घटना! कॉलेज चालवायचे असल्यास १५-२० लाख खंडणी द्या; शिक्षकांवर हल्ला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एमकेडी कॉलेजमध्ये (MKD College, Jalgaon) खंडणीची मागणी करत धमकी देण्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या फी परतावा आंदोलनादरम्यान काही जणांनी संस्थाचालकांकडे १५ ते २० लाख रुपयांची खंडणी (Extortion of ₹15 to ₹20 lakh) मागितली. पैसे न दिल्यास कॉलेज जाळपोळ, शिक्षकांना मारहाण (Assault on teachers) आणि हॉस्टेलमधील मुलांना इजा पोहोचवू, अशा धमक्या दिल्या. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल (Case registered at the police station) करण्यात आला असून, प्रकरणाची तपासणी सुरू आहे. 

आदित्य अजबसिंग पाडवी आणि राहुल पावरा यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चिथावणी दिल्याचा आरोप आहे. संस्थेचे व्यवस्थापन, स्टाफ आणि आमदारांचा रस्ता अडवून आरोपींनी “कॉलेज सुरू ठेवायचे असल्यास पैसे द्या, आम्ही आंदोलन संपवू” अशी मागणी केली. “आमचे नेटवर्क मोठे आहे, बऱ्याच लोकांचा पाठिंबा आहे” असे सांगत धमकी दिली. या प्रकरणी एमकेडी कॉलेजचे चालक धनंजय हरीभाऊ बडवर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, ५ जुलै रोजी संध्याकाळी एमकेडी पॉलिटेक्निकचे शिक्षक विवेक जयसिंग वळवी यांच्यावर हल्ला झाला. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या चर्चेत भाग घेतल्याने आश्विन कोकणी, चंद्रकांत बागुल, कृष्णा गावीत व इतरांनी शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण केली. रस्ता अडवून दमदाटी केल्याची तक्रारशिक्षक विवेक वळवी यांनी केली आहे. या प्रकरणातही तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही घटनांमध्ये तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोरे आणि हवालदार काशिनाथ साळवे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत खंडणी आणि हिंसाचाराचे प्रकार वाढल्याने स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी संस्थाचालक आणि शिक्षकांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांवर होणारे अशा प्रकारचे दबाव आणि हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.