AICTE चा मोठा निर्णय! देशातील 58 तर राज्यातील सर्वाधिक 12 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद
महाविद्यालयात आधीपासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्ष सुरू राहील आणि त्यांना पदवी पूर्ण करण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ कोणताही फटका बसणार नसला, तरी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संस्था उपलब्ध राहणार नाहीत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी देशभरातील 58 अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांना 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर'ची मंजुरी (Approval for progressive closure) दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक 12 महाविद्यालयांचा (12colleges in Maharashtra closed) समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या महाविद्यालयांची अधिकृत नावानिशी यादी अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील या 12 महाविद्यालयाला या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षासाठी नवीन प्रवेश देता येणार नाही. मात्र, त्या महाविद्यालयात आधीपासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्ष सुरू राहील आणि त्यांना पदवी पूर्ण करण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ कोणताही फटका बसणार नसला, तरी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संस्था उपलब्ध राहणार नाहीत.
एआयसीटी च्या आकडेवारीनुसार, 2025-26 या शैक्षणिक वर्षात देशभरात 950 हून अधिक अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमही बंद करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 12 महाविद्यालयांना 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर'ची मंजुरी देण्यात आली असून, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 8, तेलंगणामध्ये 4, पंजाबमध्ये 4, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, तर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2 महाविद्यालयांचा समावेश आहे. हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका संस्थेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
एआयसीटीई 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर' आणि 'कम्प्लीट क्लोजर' या दोन वेगवेगळ्या संकल्पना लागू करते. प्रोग्रेसिव्ह क्लोजरमध्ये संस्था टप्प्याटप्प्याने बंद केली जाते आणि विद्यमान विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली जाते. तर कम्प्लीट क्लोजरमध्ये संस्था किंवा अभ्यासक्रम पूर्णपणे बंद केले जातात आणि विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था इतर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये केली जाते.
तज्ज्ञांच्या मते, अभियांत्रिकी शिक्षणातील घटती विद्यार्थीसंख्या, आवश्यक पात्र प्राध्यापकांची कमतरता, मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव तसेच एआयसीटीईच्या संचालनात्मक नियमांचे पालन न करणे ही अशा कारवाईमागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची एआयसीटीई मान्यता, अभ्यासक्रमाची स्थिती आणि संस्थेची अधिकृत माहिती तपासूनच अंतिम निर्णय घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.