एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष, तर कामकाजासाठी २३४ दिवस; शिक्षणमंत्र्यांची माहिती
आतापर्यंत १५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून नवीन २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आतापर्यंत १५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून नवीन २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष (The new academic year will start from April) एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे. या शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस २३४ (Working days 234) असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून, शालेय शिक्षणात नवे बदल होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी २ यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षकांकडून मांडण्यात आल्या. त्या समस्यांना उत्तरेही देण्यात आली आहेत. त्यामुळे आता नव्या रचनेनुसार शैक्षणिक कामकाज २३४ दिवस करावे लागणार आहे, असे राहुल रेखावार यांनी सांगितले.
राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार ८ ते २५ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी २ या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला.