NCERT ची पुस्तके नववी ते बारावीसाठी अनिवार्य; CBSE कडून संलग्न शाळांना इशारा 

कोणत्याही शाळेने आक्षेपार्ह मजकूर असलेले पुस्तक लिहिल्याचे आढळून आल्यास अशा मजकुरासाठी शाळा जबाबदार असणार आहे. याशिवाय शाळांवर बोर्डाकडून कारवाई केली जाणार आहे.

NCERT ची पुस्तके  नववी  ते बारावीसाठी अनिवार्य; CBSE कडून संलग्न शाळांना इशारा 

एज्युवार्ता न्युज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCERT) पुस्तकांचा वापर इयत्ता 9 वी ते 12 वीसाठी अनिवार्य (mandatory) केला आहे. तसेच शाळांना 1 ते 8 वीच्या वर्गासाठी NCERT किंवा SCERT पुस्तकांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. CBSE ने शाळांद्वारे पाठ्यपुस्तकांच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा (Amendments to Guidelines) केली आहे. 

CBSE च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये प्रस्तावित सुधारित नियमात असे म्हटले आहे की, "शाळा CBSE अभ्यासक्रमात विहित केलेल्या NCERT पाठ्यपुस्तकांचे अनिवार्यपणे पालन करतील. ज्या विषयांसाठी NCERT/SCERT पुस्तके उपलब्ध नाहीत, ती CBSE पुस्तके वेबसाइटवर अपलोड केली जातील. शाळेने वापरलेले पूरक साहित्य आणि डिजिटल साहित्य नेहमी NCF-SE अनुरूप असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही शाळेने आक्षेपार्ह मजकूर असलेले पुस्तक लिहिल्याचे आढळून आल्यास अशा मजकुरासाठी शाळा जबाबदार असेल." अशा शाळांवर बोर्डाकडून कारवाई केली जाईल,असा इशाराही सीबीएसईने दिला आहे.

बोर्डाने केलेल्या दुरुस्तीमध्ये खाजगी प्रकाशकांच्या पुस्तकांच्या वापरावर मर्यादा घालताना सीबीएसईने विहित केलेल्या पुस्तकांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. खाजगी प्रकाशकांच्या पुस्तक वापराबाबत, CBSE ने म्हटले आहे की, "पूरक साहित्य, डिजिटल सामग्री तसेच खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून समाजातील कोणाचेही नुकसान होणार नाही. वर्ग, समुदाय, लिंग किंवा कोणत्याही धार्मिक गटाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत."