न्यायालयाच्या आदेशाने शाळा शेतकऱ्याच्या ताब्यात, विद्यार्थी भर उन्हात घेतात शिक्षण 

प्राथमिक माहितीनुसार, बनचिंचोली गावाच्या पश्चिमेस असलेल्या कै. नारायणराव भुजंगा पौळ यांच्या शेतातील सुमारे पाच ते सहा गुंठे जमीन १९६० नंतर मौखिक स्वरूपात शाळेसाठी दान देण्यात आली होती. त्या जागेवर जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या बांधण्यात आल्या आणि गेल्या साठ वर्षांपासून येथे शिक्षण दिले जात होते.

न्यायालयाच्या आदेशाने शाळा शेतकऱ्याच्या ताब्यात, विद्यार्थी भर उन्हात घेतात शिक्षण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नांदेड जिल्ह्यातील एका घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेवर (Nanded District Education System) शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे. हादगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेची (Zilla Parishad School Banchincholi) कोट्यावधी रुपयांची सुसज्ज शालेय इमारत न्यायालयाच्या आदेशानुसार (Court order) एका शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शाळेतील पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणारे १२९ विद्यार्थी उघड्यावर (Open school for 129 students) पडले असून भर उन्हात ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. यामुळे शिक्षण विभाग भावना शुन्य झालाय का? म्हणून चिमुकल्यांची अग्नीपरीक्षा घेत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. डोक्यावर उन्हाच्या झळा, खाली जमीन तप्त झालेली अन् अशा परिस्थितीत मागील ४ दिवसांपासून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, बनचिंचोली गावाच्या पश्चिमेस असलेल्या कै. नारायणराव भुजंगा पौळ यांच्या शेतातील सुमारे पाच ते सहा गुंठे जमीन १९६० नंतर मौखिक स्वरूपात शाळेसाठी दान देण्यात आली होती. त्या जागेवर जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या बांधण्यात आल्या आणि गेल्या साठ वर्षांपासून येथे शिक्षण दिले जात होते. मात्र, त्या काळात दानपत्राची नोंदणी करण्यात आली नाही, सातबारावर नोंद झाली नाही तसेच कायदेशीर दस्तऐवज तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे ही जागा कायदेशीररीत्या खासगी मालकीचीच राहिली. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला, पण याचा फटका आता ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बसला आहे. 

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत शाळेची इमारत फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आली. यामुळे १२९ विद्यार्थी वर्गाविना झाले असून शाळेची सर्व अभिलेखे दोन अंगणवाडी खोल्यांमध्ये हलविण्यात आली आहेत. शैक्षणिक साहित्य व साधने उघड्यावर पडली असून विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर घाला घालणारी असल्याचे पालक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

शासनाच्या निष्काळजीपणामुळे शाळा उघड्यावर गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. ही घटना समाजासाठी अत्यंत धक्कादायक ठरली असून शाळा, मंदिर, समाजकार्यांसाठी जमीन दान करणाऱ्या दात्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आज दान दिलेल्या जमिनीचा उद्या कोर्टात वाद झाला तर काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दानपत्र व कायदेशीर नोंद नसल्यास भविष्यात अशा अनेक शाळा, समाजभवन व सार्वजनिक संस्था संकटात येऊ शकतात, असा इशाराही या घटनेतून मिळतो.