माय मराठीची मुस्कटदाबी! ८० मराठी शाळांचे इंग्रजीत रुपांतर, नवी मुंबई पालिकेचा ठराव मंजूर

सध्या शिकत असलेले सर्व विद्यार्थी आपल्या मूळ माध्यमात म्हणजे मराठी भाषेतच शिक्षण पूर्ण करतील. मात्र, नवीन प्रवेश बालवाडीपासून इंग्रजी माध्यमात होतील. शिवाय मराठी विषय अनिवार्य राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

माय मराठीची मुस्कटदाबी!  ८० मराठी शाळांचे इंग्रजीत रुपांतर, नवी मुंबई पालिकेचा ठराव मंजूर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) शहरातील सुमारे ८० महापालिका शाळांचे त्यापैकी बहुतेक मराठी माध्यमाच्या आहेत, अशा शाळांचे इंग्रजी माध्यमात (English Medium School) टप्प्याटप्प्याने रूपांतर करण्याचा ठराव मंजूर (Resolution Passed) केला आहे. यामध्ये सुमारे ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘शिक्षण रूपांतर धोरण २०२६’ (Education Transformation Policy) अंतर्गत जून २०२६ पासून बालवाडी वर्गापासून हा बदल सुरू होणार असल्याची घोषणा प्रशासनाने (Administration's Announcement) केली आहे.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, खासगी शाळांतील महागड्या इंग्रजी शिक्षणाचा मक्तेदारी मोडून सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. सध्या शिकत असलेले सर्व विद्यार्थी आपल्या मूळ माध्यमात म्हणजे मराठी भाषेतच शिक्षण पूर्ण करतील. मात्र, नवीन प्रवेश बालवाडीपासून इंग्रजी माध्यमात होतील. शिवाय मराठी विषय अनिवार्य राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मात्र, या निर्णयाला राजकीय तीव्र विरोध उभा राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला ‘मराठी शाळा बंद करण्याचा आणि खाजगीकरणाचा घाट’ असल्याचे म्हटले आहे. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी निर्णयाचा निषेध करत, तो मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. तसेच शिंदे गटातील विजय चौगुले यांनीही या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर काही नेत्यांनी न्यायालयीन लढाईचीही तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, वादाचे दोन मुख्य पैलू आहेत. एकीकडे ‘मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या अस्तित्वावर गदा’ येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे इंग्रजी ज्ञानाशिवाय आधुनिक नोकऱ्या आणि जागतिक संधी मिळणे कठीण जात आहे. सध्या हा मुद्दा राजकीय आणि भाषिक वादात रूपांतरित झाला असून, मराठी भावना आणि व्यावहारिक शिक्षणाची गरज याच्यातील तिढा अधिक तीव्र होत चालला आहे.