11th Admission:अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ; 8 लाख 73 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
अकरावी प्रवेशासाठी 21 लाख 37 हजार 550 जागा उपलब्ध असून प्रवेशासाठी 14 लाख 10 हजार 612 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.त्यातील केवळ 5 लाख 36 हजार 987 जागांवर विद्यार्थिनी प्रवेश घेतला आहे. परिणामी अजूनही 8 लाख 73 हजार 625 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (State Department of School Education)इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी (11th Admission)राज्यभर राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे जुलै महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरीही लाखो विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित (Student denied admission)आहेत. शहरी व ग्रामीण भागातही केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळे प्रवेशाचा सुरू असलेला सावळा गोंधळ (Confusion over ) थांबवून तात्काळ पूर्वी प्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवावी,अशी मागणी केली जात आहे.अकरावी प्रवेशासाठी 21 लाख 37 हजार 550 जागा उपलब्ध असून प्रवेशासाठी 14 लाख 10 हजार 612 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.त्यातील केवळ 5 लाख 36 हजार 987 जागांवर विद्यार्थिनी प्रवेश घेतला आहे. परिणामी अजूनही 8 लाख 73 हजार 625 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे.
अकरावी प्रवेशासाठी यंदा प्रथमच राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात मध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक झाले आहे. राज्यातील 9 हजार 483 कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी आतापर्यंत 14 लाख 10 हजार 612 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन प्रवेश फेरीतून 17 लाख 62 हजार 794 जागा उपलब्ध आहेत. तर कोटांतर्गत प्रवेशासाठी 3 लाख 74 हजार 756 जागा उपलब्ध आहेत. फेरीअंतर्गत प्रवेशाच्या 13 लाख 6 हजार 458 जागा उपलब्ध असून कोटा अंतर्गत प्रवेशाच्या 2 लाख 94 हजार 105 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या 14 लाख 10 हजार 612 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी अजूनही प्रवेशासाठी 16 लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा रिक्त जागांची संख्या अधिक आहे.
एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक असेल तर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविणे उचित ठरते. मात्र, अकरावी प्रवेशासाठी 21 लाख 37 हजार 550 जागा उपलब्ध असताना 14 लाख मुलांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----------------
स.प. महाविद्यालयामध्ये आत्तापर्यंत एकूण प्रवेश क्षमतेच्या 50 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दुसऱ्या फेरीतून सुमारे 25 ते 30 टक्के विद्यार्थी प्रवेश घेतील,अशी स्थिती आहे. शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुमारे दहा ते पंधरा दिवस विलंब झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील गांभीर्य कमी झाले. अनेक विद्यार्थी व पालक महाविद्यालयात प्रवेशासाठी येतात. मात्र, या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा ऑनलाईन अर्जही भरलेला नसतो. अनेक विद्यार्थी व पालक ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहेत.
- डॉ. सुनील गायकवाड, प्राचार्य, स. प. महाविद्यालय, पुणे
-------------------
अकरावी प्रवेशास संपूर्ण राज्यभरासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता नव्हती. जागा जास्त आणि विद्यार्थी कमी असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा हेतू काय ? हे अनाकलनीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी तर आपापल्या परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेतात. तेथे सुद्धा जागा जास्त व प्रवेश घेणारे विद्यार्थी कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या प्रक्रियेत दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश द्यावा.
- डॉ. सुधाकर जाधवर, अध्यक्ष, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
-------
शिरूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत अकरावीत केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. दुसऱ्या फेरीतून 20 ते 30 टक्के प्रवेश होतील, असे दिसून येते. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरले नसल्याचे विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादातून निदर्शनास आले आहे. तर काहींनी प्रवेश मिळाल्यानंतर अर्ज लॉक केला नसल्याने त्यांना पुन्हा प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे लागत आहे.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा कॉलेज, शिरूर, पुणे
-----------
राज्यभरासाठी राबवलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया ही केवळ अनावश्यक बाब आहे. ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने अजूनही या प्रक्रियेत सुधारणा करून जुन्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्याची भूमिका घ्यावी.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ