बोर्डाची बारावी निकालाची तारीख चुकली; नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थी तणावाखाली
नीट परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या निकालाच्या तुलनेत खालून चौथ्या ते पाचव्या क्रमांकावर असतो.त्यात बोर्डाने एक दिवस आधी निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर आणि मानसिकतेवर त्याचा वाईट परीणाम होऊ शकतो.त्यामुळे राज्य मंडळाच्या निकाल जाहीर करण्याच्या निर्णयावर टीका केली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा येत्या 3 मे रोजी होणार आहे.या परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात.मात्र, या परीक्षेच्या अगदी एक दिवस आधी राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञ व्यक्तीकडून सांगितले जात आहे.त्यामुळे राज्य मंडळाची निकालाची तारीख चुकली, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी दुपारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला.गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा निकालात 2.09 टक्क्यांनी घट झाली आहे.राज्याचा बारावीचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. त्यात मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. तसेच मेडिकल प्रवेशासाठी लातूरमधील सर्वाधिक विद्यार्थी शासकीय मेडिकल कॉलेजमधील जागा मिळवतात.मात्र, यंदा लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.नीट परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या निकालाच्या तुलनेत खालून चौथ्या ते पाचव्या क्रमांकावर असतो.त्यात बोर्डाने एक दिवस आधी निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर आणि मानसिकतेवर त्याचा वाईट परीणाम होऊ शकतो.त्यामुळे राज्य मंडळाच्या निकाल जाहीर करण्याच्या निर्णयावर टीका केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षण खात्यात आयएएस अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठवले जात आहे. शिक्षण खाते हे केवळ पुण्यात पोस्टिंग हवे म्हणून त्यांनी स्वीकारलेले असते.त्यामुळे कोणत्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो, याची जाणीव त्यांना नसते.त्यामुळे शिक्षण विभागात आयएएस अधिकारी नको,अशी मागणी वेळोवेळी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या संघटनांनी घेतली आहे.
--------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने याबाबत दक्षता घायायला हवी होती. नीट परीक्षेच्या आधी एक दिवस निकाल जाहीर करणे अयोग्य आहे. शासनाने विचार करायला हवा होता. नीट साठी पीसीबी ग्रुपमधील 50 टक्के गुण पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातात. काही विद्यार्थ्यांना हे गुण मिळत नाही. तसेच काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तरी सुध्दा विद्यार्थी तणावाखाली जातात.मेडिकल प्रवेशासाठी नीट ही एकमेव परीक्षा आहे. तसेच ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे वर्षभारापूर्वीपासून सर्वांना माहीत होते. तरीही या परीक्षेच्या एक दिवस आधी बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामुळे निकाल कमी लागल्याने निराश झालेल्या विद्यार्थीना नीट परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरे जाता येणार नाही. पुढील वर्षी शासनाने ही बाब लक्षात घ्यावी.
- दुर्गेश मंगेशकर,संचालक, IITPK प्रशिक्षण केंद्र
-------------------------------------------------
बोर्डाची निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चितच चुकली आहे. कमी गुण मिळल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. एक आठवडाभर आधी किंवा चार तारखेला लावणे उचित ठरले असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकाल पाहणार नाहीत.बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून निकाल जाहीर करणे आवश्यक होते.
- हरीश बुटले, संस्थापक सचिव, डीपर,
--------------------------------------------------