मोठी बातमी: प्राध्यापक भरती निकषात बदल;नवा GR राज्यपाल कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर
काही विषयांना तर उमेदवारच मिळणार नाही,अशी परिस्थिती निर्माण होईल,अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75:25 या सूत्राएवजी पुन्हा 50:50 चे सूत्र आवलंबले जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने (Department of Higher Education) प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये (Criteria for Faculty Recruitment)बदल करणारा अध्यादेश (जीआर) 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केला. मात्र, त्यातील निकषांमुळे अनेक उच्च शिक्षित उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्रच ठरणार नाहीत. त्यामुळे हा अध्यादेश मागे घ्यावा,अशी मागणी शिक्षण वर्तुळातून करण्यात आली.तसेच प्रसारमध्यमांमध्ये सुद्धा यावर मोठ्या प्रमाणावर टिकात्मक लेखन झाले. या सर्व बाबींची दाखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)यांनी गांभीर्याने घेतली. त्याचप्रमाणे याबाबत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी यासंदर्भात संवाद साधून वस्तूस्थिती जाणून घेतली. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजीच्या अध्यादेशात बदल करण्याचे निश्चित करून त्यात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले.आता राज्यपाल कार्यालयाकडे प्राध्यापक भरतीच्या निकषात बदल केलेला नवीन अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपाल कार्यालयाकडे(Governor's Office)पाठवण्यात आला आहे, असे उच्च शिक्षण विभागातील विशेष सूत्रांनी सांगितले.
राज्यातील आकृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी कोणते निकष असावेत.तसेच भरती करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा,याबाबत राज्य शासनाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला होता. परंतु, या अध्यादेशातील निकष अत्यंत वादग्रस्त असल्याने त्यास विरोध झाला. नेट-सेट उत्तीर्ण उमेदवारांवर या अध्यादेशामुळे मोठा अन्याय होणार होता. तसेच परराज्यातील उमेदवार या भरतीसाठी अधिक प्रमाणात पात्र ठरतील. या उलट महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील उमेदवार भरतीपासून दूर राहतील.त्याचप्रमाणे काही विषयांना तर उमेदवारच मिळणार नाही,अशी परिस्थिती निर्माण होईल,अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75:25 या सूत्राएवजी पुन्हा 50:50 चे सूत्र आवलंबले जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील विद्यापीठांमधील सुमारे 600 प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.काही विद्यापीठांनी भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. मात्र, बदललेल्या निकषांमुळे विद्यापीठाकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी घट झाली असल्याची माहिती एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.परिणामी एकूण परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा प्राध्यापक भरतीच्या निकषात बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.केवळ नेट- सेट उत्तीर्ण असणारे उमेदवार विद्यापीठातील पद भरतीसाठी पात्रच ठरत नव्हते.परंतु,नव्या निकषामुळे त्यांना ही संधी मिळणार आहे,असेही सूत्रांनी सांगितले.