राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती: चंद्रकांत पाटील यांची घोषणा; प्राचार्य फोरम अधिवेशन उद्घाटन 

2017 ते 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांची संख्या साडेपाच हजार आहे. मुख्यमंत्र्यांकडून या साडेपाच हजार प्राध्यापकांच्या भरतीसाठी नुकतीच मान्यता मिळवली आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 2900 पदे भरण्यासही मंजुरी घेतली आहे.

राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती: चंद्रकांत पाटील यांची घोषणा; प्राचार्य फोरम अधिवेशन उद्घाटन 

एज्यवार्ता न्यूज नेटवर्क 

 राज्यात प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न वीस वर्ष प्रलंबित होता. सुरुवातीला सुमारे 2800 पद भरतीला मान्यता घेण्यात आली त्यातील 2100 पदे भरण्यात आली. विद्यापीठातील प्राध्यापक भरती संदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. पुढील एक- दोन दिवसात त्यावरील स्थगिती उठेल. त्यामुळे विद्यापीठातील सुमारे 700 हून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जातील. त्याचप्रमाणे 2017 ते 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांची संख्या 5 हजार 500 आहे. मुख्यमंत्र्यांकडून या 5 हजार 500 प्राध्यापकांच्या भरतीसाठी नुकतीच मान्यता मिळवली आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 2900 पदे भरण्यासही मंजुरी घेतली आहे, वित्त विभागाकडे या संदर्भातील फाईल गेल्यानंतर अध्यादेश प्रसिद्ध होईल,अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजच्या 40 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी नॅकच्या एक्झिक्यूटिव्ह कमिटीचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते, उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, प्राचार्य फोरमचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख, माजी अध्यक्ष प्रा.नंदकुमार निकम, डॉ. सुधाकर जाधवर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार किरण सरनाईक, सुकाणू समिती सदस्य अनिल राव आदी उपस्थित होते.

 प्राचार्यांच्या वयासंदर्भात 62 चे 65 करण्यासंदर्भातील विषयावर केवळ मंत्रिमंडळात मान्यता घ्यायचा विषय बाकी आहे. मात्र, आज पासूनच प्राचार्यांनी 62 चे 65 झाले असे गृहीत धरण्यास हरकत नाही, असे नमूद करून चंद्रकांत पाटील म्हणाले, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या विषयासंदर्भात मी स्वतः तीन वेळा  प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर दिल्लीत गेलो. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांबरोबर या विषयावर चर्चा केली आहे. शिक्षण विभाग याबाबत सकारात्मक असले तरी अर्थ खाते याबाबत अजूनही सकारात्मक नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्राचार्य हा महाविद्यालयाचा नेता असतो. प्राचार्याच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचे कामकाज चालते. केवळ पुस्तकी किडा म्हणून विद्यार्थ्याला तयार करण्याऐवजी त्याला रोजगार भिमुख करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केला जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी मध्ये उच्च शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका काय असावी? अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी काय केले पाहिजे. त्यातील त्रुटी कोणत्या यावरती चांगला अहवाल दोन दिवसाच्या अधिवेशनातून व्हावा, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.