केंद्रप्रमुख पदोन्नती CTET निकालामुळे अडचणीत, सुप्रिया सुळेंची धर्मेंद्र प्रधानांकडे 'ही' मागणी
राज्य परिषदेच्या मुदतीनुसार या शिक्षकांना ३१ मार्च २०२६ पूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्याची माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे या निकालावर हजारो शिक्षकांची पदोन्नती आणि करिअरचा संबंध असून त्याचा प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सीटीईटी परीक्षा होऊन ४० दिवस उलटूनही अद्याप निकाल (CTET Exam Result) रखडल्याने राज्यातील हजारो जिल्हा परिषद शिक्षकांना (ZP School Teacher) 'समूह साधन केंद्र समन्वयक' (Group Resource Center Coordinator) पदाच्या पदोन्नतीसाठी माहिती भरण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे समूह साधन केंद्र समन्वयक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदोन्नतीपासून वंचित राहाण्याची भीती या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. शिक्षकांची गोंधळलेली परिस्थिती लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी CTET चे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची 'समूह साधन केंद्र समन्वयक' (केंद्रप्रमुख) या पदासाठी नियुक्ती देण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५'चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्याची माहिती ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. मात्र, सीटीईटी निकाल अद्याप लागला नसल्याने पात्र शिक्षकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
सीबीएसई द्वारे ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या CTET परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे राज्यातील हजारो शिक्षकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. हे निकाल साधारणपणे ३० दिवसांच्या आत जाहीर केले जातात. मात्र, ४० हून अधिक दिवस उलटूनही, या निकालांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान विनंती आहे की, त्यांनी कृपया या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि CTET चे निकाल लवकरात लवकर जाहीर होतील याची खात्री करावी. जेणेकरून या शिक्षकांच्या नियुक्त्या आणि करिअरमधील प्रगतीमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.
केंद्रप्रमुख पदासाठी आयबीपीएस द्वारे आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत राज्यातील सुमारे १ हजारांपेक्षा अधिक शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. राज्य परिषदेच्या मुदतीनुसार या शिक्षकांना ३१ मार्च २०२६ पूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्याची माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे या निकालावर हजारो शिक्षकांची पदोन्नती आणि करिअरचा संबंध असून त्याचा प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.