समाजासाठी काहीतरी देण्याच्या जाणीवेतून उद्योग उभारा : विलास शिंदे
विलास शिंदे यांनी सह्याद्री फार्मच्या माध्यमातून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून उभारलेले यशस्वी व्यवसाय मॉडेल उलगडले. आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येते, हे सह्याद्री फार्मने प्रत्यक्षात सिद्ध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
धाडस, चिकाटी, सातत्य आणि मूल्याधिष्ठित कामकाजाच्या बळावरच उद्योजकतेचा पाया भक्कम राहतो. केवळ नफा कमावण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव ठेवून उद्योग उभारल्यास दीर्घकालीन यश निश्चित मिळते, असा संदेश बिव्हीजी इंडियाचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड आणि सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी तरुणांना दिला.
पुणे पुस्तक महोत्सवातील लिट फेस्टमध्ये उद्योजकतेचे समरांगण या विषयावर झालेल्या प्रेरणादायी संवादात गायकवाड आणि शिंदे यांच्याशी वसुंधरा काशिकर यांनी सखोल चर्चा केली. या संवादात दोन्ही उद्योजकांनी आपापल्या प्रवासातील संघर्ष, अपयशांमधून घेतलेले धडे आणि यशापर्यंतचा टप्प्याटप्प्याने झालेला प्रवास मांडला. महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
गायकवाड म्हणाले, देश, विदेशात खूप क्षेत्रात संधी आहेत. त्या शोधता आल्या पाहिजेत. आपण स्वतःचा शोध घेतला की मार्ग निश्चित सापडतो."
व्यवसाय उभारणीच्या सुरुवातीच्या काळातील आव्हाने सांगताना शून्यातून सुरुवात करून शिस्तबद्ध व्यवस्थापन, गुणवत्तेवर भर आणि कर्मचारी हेच उद्योगाचे खरे भांडवल मानण्याच्या भूमिकेमुळे बिव्हीजी इंडिया उभी राहिल्याचे नमूद केले. संधी ओळखून त्यावर सातत्याने काम केल्यास उद्योगाचा विस्तार शक्य होतो, असा अनुभव गायकवाड यांनी सांगितला.
विलास शिंदे यांनी सह्याद्री फार्मच्या माध्यमातून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून उभारलेले यशस्वी व्यवसाय मॉडेल उलगडले. आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येते, हे सह्याद्री फार्मने प्रत्यक्षात सिद्ध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेती आणि उद्योग यांची सांगड घालून ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवता येते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.