'महाटीईटी'ला 'या' कारणामुळे यंदा विक्रमी नोंदणी, तब्बल ६ लाख उमेदवार देणार परीक्षा

रविवार दि. २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पेपर -१ इयत्ता १ ली ते ५ वी हा सकाळी १०:३० ते १ या वेळेत तर पेपर -२ इयत्ता ६ वी ते ८ वी हा दुपारी २:३० ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे.

'महाटीईटी'ला 'या' कारणामुळे यंदा  विक्रमी नोंदणी, तब्बल ६ लाख उमेदवार देणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) कडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (MAHA TET 2026) यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातून तब्बल सहा लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी ( 6 Lakh Candidates) केली. ही संख्या गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक म्हणजे विक्रमी नोंदणी (Registration Record) आहे. सर्वोच्च न्यायालयाने सध्या रुजू असलेल्या शिक्षकांना बढतीसाठी तर भावी शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केले आहे. त्यामुळे यंदा महाटीईटी परीक्षेला विक्रमी नोंदणी झाल्याचे समोर येत आहे. 

परीक्षा परिषदेकडून दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पेपर -१ इयत्ता १ ली ते ५ वी हा सकाळी १०:३० ते १ या वेळेत तर पेपर -२ इयत्ता ६ वी ते ८ वी हा दुपारी २:३० ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक इन-सर्व्हिस शिक्षकांना देखील टीईटी उत्तीर्ण करणे गरजेचे झाले आहे. याशिवाय, शिक्षकी पेशाकडे युवकांचा वाढता कल, सरकारी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असणे आणि बेरोजगारीमुळे स्थिर नोकरीची मागणी यामुळे यंदा नोंदणीचा आकडा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. 

परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेला दोन्ही पेपर मिळून ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित राहिले. या परीक्षेत ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते.

यंदा नोंदणीचा आकडा सहा लाखांपर्यंत पोहोचल्याने परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारीही वाढली आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, “यंदा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे.”