सरकारचा मोठा निर्णय! नीट परीक्षेमुळे देशात 'या' तारखेपर्यंत टेलिग्राम राहणार बंद
नीट यूजी २०२६ ची मूळ परीक्षा ३ मे २०२६ रोजी झाली होती, परंतु पेपर लीक प्रकरणामुळे ती रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. आता २१ जून २०२६ रोजी री-एक्झाम होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) री-एक्झाममध्ये (Re-exam) पेपर लीक (Exam paper leak) आणि फसवणुकीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) शिफारशीवरून सेक्शन ६९A अंतर्गत टेलिग्राम अॅपला देशभरात तात्पुरता प्रतिबंध (Telegram app ban) केला आहे. ही बंदी नीट परीक्षा संपल्यानंतर २२ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.
नीट यूजी २०२६ ची मूळ परीक्षा ३ मे २०२६ रोजी झाली होती, परंतु पेपर लीक प्रकरणामुळे ती रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. आता २१ जून २०२६ रोजी री-एक्झाम होणार आहे. यापूर्वी टेलिग्रामवर अनेक फेक चॅनेल्स आणि ग्रुप्स सक्रिय होते, ज्यात बनावट पेपर विक्री, जुने मेसेज एडिट करून लीकचे दावे आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांकडून लाखो-करोडो रुपयांची फसवणूक केली जात होती. NTA ने यावरून सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली.
NTA च्या अधिकृत निवेदनानुसार, टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरून परीक्षेशी संबंधित अफवा, बनावट पेपर आणि फसवणुकीच्या नेटवर्क्सना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केवळ अॅपचा अॅक्सेस बंद करण्यात आला नाही, तर जुने मेसेज एडिट करण्याची सुविधाही काही काळासाठी निष्क्रिय करण्यात आली आहे. NTA ने या निर्णयाचे स्वागत केले असून, तो परीक्षेच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, री-एक्झामसाठी देशभरातील ५५१ केंद्रांवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. प्रश्नपत्रिका भारतीय वायुसेनेमार्फत वाहून नेल्या जातील, बहुस्तरीय एस्कॉर्ट, AI-सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक्सचा वापर केला जाईल. यापूर्वी CBI आणि राज्य पोलिसांनी अनेक फसवणूक सिंडिकेट्सवर कारवाई केली आहे.
काही विद्यार्थी आणि पालक या निर्णयाचे स्वागत करत आहेत, कारण त्यामुळे फेक लीकच्या अफवांपासून मुक्तता मिळेल. मात्र, अनेकांना टेलिग्रामवरील अभ्यास ग्रुप्स, नोट्स शेअरिंग आणि अपडेट्स मिळण्यात अडचण येणार आहे. सोशल मीडियावर ‘दुख का माहौल’ असे मीम्स व्हायरल होत आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की ही केवळ तात्पुरती कारवाई आहे आणि २२ जूननंतर सामान्य स्थिती पूर्ववत होईल. कायमस्वरूपी बंदीचा प्रश्नच नाही.=