5 वी , 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 60 ते 70 टक्के कठीण प्रश्न ; ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचा आक्षेप 

विशेषतः भाषा व गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांचा वयोगट, बौद्धिक, मानसिक विकास पातळी आणि निर्धारित अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक कठीण वाटल्या. काही अंशी अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याचे निदर्शनास आले आहे.

5 वी , 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 60 ते 70 टक्के कठीण प्रश्न ; ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचा आक्षेप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा अत्यंत कठीण प्रश्न विचारण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असून प्रश्नपत्रिका तयार करताना विद्यार्थ्यांचा वयोगट, मानसिकता, अभ्यासक्रम आणि शिकण्याची पातळी यांचा शिक्षण मानसशास्त्रीय विचार करावा.तसेच प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी संतुलित ठेवून ती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे न्याय्य मूल्यमापन करणारी असावी.त्याचप्रमाणे मूल्यमापन प्रक्रियेत आकलन, विश्लेषण, समस्या सोडवणे यांना प्राधान्य देणाऱ्या प्रश्नप्रकारांचा समावेश करण्यात यावा,अशी अपेक्षा ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने केली असून याबाबतचे निवेदन परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे.

 राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली इयत्ता पाचवीसाठी राज्यातील 6 लाख 57 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 6 लाख 34 हजार 920 विद्यार्थी म्हणजेच 96.61 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तर इयत्ता आठवीसाठी 3 लाख 87 हजार 623 विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती.त्यातील 7 लाख 73 हजार 931 विद्यार्थी म्हणजेच 96.47 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. मात्र, परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता विचारात घेऊन प्रश्न विचारले गेले नाही,असे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांचे म्हणणे आहे. ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. 

पालक आणि शिक्षक यांच्यात नाराजीचा सूर

शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांमधील बौद्धिक गुणवत्ता, संकल्पनात्मक आकलन, तार्किक विचारशक्ती आणि शैक्षणिक क्षमता ओळखण्याची राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील अनेकांपैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. विशेषतः ग्रामीण व सामाजिकदृष्ट्या वंचित पृष्ठभूमीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा केवळ आर्थिक सहाय्याची एक संधी नसून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला दिशा देणारे प्रेरणास्थान असते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, अभ्यासाची सवय आणि उत्कृष्टतेची जाणीव निर्माण करण्यात या परीक्षेची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे, ही बाब नाकारता येत नाही. मात्र, यावर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रश्नपत्रिकांबाबत राज्यभर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. विशेषतः भाषा व गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांचा वयोगट, बौद्धिक, मानसिक विकास पातळी आणि निर्धारित अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक कठीण वाटल्या. काही अंशी अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, परीक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याऐवजी उलट त्यांच्यासाठी मानसिक ताणाचे कारण ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत नाही

शैक्षणिक मानसशास्त्रानुसार लहान वयातील विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन हे त्यांच्या आकलन क्षमतेला चालना देणारे, शिकण्याची प्रेरणा वाढवणारे आणि आत्मविश्वास दृढ करणारे असणे अपेक्षित असते. परंतु प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीपेक्षा खूपच कठीण असल्यास त्यांचे आत्मविश्वासात घट होणे, शिक्षण व परीक्षेबद्दल भीती निर्माण होणे, अंतर्गत शिकण्याची प्रेरणा कमी होणे आणि सहकाऱ्यांच्या तुलनेत न्यूनगंडाची भावना वाढणे असे प्रतिकूल परिणाम दिसून येतात. अशा परिस्थितीत संकल्पनात्मक समज विकसित होण्याऐवजी केवळ गुणकेंद्री दबाव आणि अस्वस्थ स्पर्धेचे वातावरण तयार होते, जे शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांशी अजिबात सुसंगत नाही. तसेच बदलत्या शैक्षणिक दृष्टीकोनाचा विचार करता केवळ “दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा” या एकांगी स्वरूपाच्या प्रश्नांऐवजी समज, विश्लेषण आणि विचारक्षमतेचे मूल्यमापन करणाऱ्या प्रश्नप्रकारांचा समतोल समावेश करणे हीदेखील काळाची गरज आहे.

पुनरावलोकनाची पारदर्शक यंत्रणा विकसित करण्यात यावी

देश पातळीवरील युपीएससी आणि राज्य पातळीवरील एमपीएससी या प्रमुख स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांनीही मूल्यमापनाचे स्वरूप अधिक व्यापक, आकलन आणि कौशल्याधारित करण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे.त्यामुळे प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत अनुभवी शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक मानसशास्त्र तज्ज्ञांचा सहभाग निश्चित करण्यात यावा. प्रश्नपत्रिकांबाबत अभिप्राय संकलन व पुनरावलोकनाची पारदर्शक यंत्रणा विकसित करण्यात यावी. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, न्याय्य आणि विकासाभिमुख ठरेल, या दृष्टीने आपण या निवेदनाची सकारात्मक व संवेदनशील दखल घ्याल, अशी अपेक्षा नावेदनात व्यक्त करण्यात आली आहे.