शाळा-महाविद्यालयातील अल्पवयीन मुली बेपत्ता; विजय वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक
मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा गंभीर सवाल त्यांनी गृहखात्याला विचारला. फक्त एका तालुक्याची ही परिस्थिती असेल राज्यातील एकूण परिस्थिती काय असेल? या घटनेमुळे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. त्यांच्या ब्रम्हपुरी मतदार संघात (Bramhapuri Constituency) गेल्या काही दिवसांत दहावी आणि बारावीत शिक्षण घेत असलेल्या सहा मुली बेपत्ता (Six Girls Missing) असल्याचा गंभीर प्रश्न त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या अल्पवयीन मुली (Minor Girls Missing) असल्याची माहिती त्यांनी दिली. बेपत्ता झालेल्या सहापैकी मुलींपैकी केवळ दोन मुलींचा तपास लागला असून, चार मुली अजूनही बेपत्ता आहेत.
मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा गंभीर सवाल त्यांनी गृहखात्याला विचारला. फक्त एका तालुक्याची ही परिस्थिती असेल राज्यातील एकूण परिस्थिती काय असेल? या घटनेमुळे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, शाळा-महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी सरकारवर चढवल्याचे पाहायला मिळाले.
सरकार सीसीटीव्ही बसवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करते. मात्र, तालुका स्तरावर ही व्यवस्था नेमकी कुठे आहे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत व्यापक प्रबोधन करण्याची गरज व्यक्त करत, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी तात्काळ 'विशेष पथक' नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.