NTA चा मोठा निर्णय! ६०० परीक्षा तज्ज्ञांना हटवून नवीन तज्ज्ञांची नियुक्ती; परीक्षा प्रणालीत पारदर्शकता येणार
पारदर्शकता आणि परीक्षेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी, NTA ने नवीन तज्ज्ञ, चार-स्तरीय उत्तरपत्रिका तपासणी, तसेच अधिक कडक सुरक्षा आणि लेखापरीक्षण (ऑडिट) यांसारख्या उपाययोजनांद्वारे परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने परीक्षा प्रणालीतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी एक मोठी पुनर्रचना केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, एजन्सीने तब्बल ६०० तज्ज्ञांना हटवून त्यांच्या जागी नवीन तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. याशिवाय एनटीएचे नवीन कार्यालय आता मिंटो रोड येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. ही पावले परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी उचलण्यात आली आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अलीकडेच एनटीए सोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी परीक्षा सुरळीत आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले. शिक्षण मंत्र्यांनी परीक्षा प्रणालीच्या प्रत्येक टप्प्याचे सर्वसमावेशक ऑडिट करण्याचे आणि आढळलेल्या त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्याचेही आदेश दिले.
परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी एनटीएने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. प्रश्नपत्रिकांची छाननी आणखी कडक करण्यासाठी ‘चार-स्तरीय प्रश्नपत्रिका तपासणी प्रणाली’ लागू केली जाणार आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत २० ते २५ नवीन अधिकाऱ्यांची भरती केली जाईल.
एनटीएची कार्यालये युद्धपातळीवर नवीन ठिकाणी हलवली जात असून, तेथे सीआयएसएफ (CISF) पथकांद्वारे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येणार आहे.या पुनर्रचनेच्या अंतर्गत ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून, १० नवीन व्यावसायिक पदांसाठी अधिसूचना जारी करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स आणि प्रश्नपत्रिका रचना यांसारख्या विशेष क्षेत्रांसाठी खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
एनटीएच्या कार्यालयाबाहेरील सुरक्षा प्रणालीतही लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वी इंग्रजी, समाजशास्त्र आणि वाणिज्य विषयांच्या यूजीसी-नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विसंगती आढळल्याने त्या रद्द करून पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी एनटीएने ही कठोर पावले उचलली आहेत. या बदलांमुळे भविष्यात परीक्षा अधिक निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.