बोर्डाच्या परीक्षा डिजिटल पद्धतीने; त्रिगुण कुलकर्णी यांचे सुतोवाच
इयत्ता बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छपाईसाठी १० कोटी ७२ लाख ८० हजार ३६० पृष्ठे व नमूना उत्तरपत्रिकांसाठी १९ लाख २९ हजार ३८० पृष्ठे अशी एकूण १० कोटी ९२ लाख ०९ हजार ७४० पृष्ठांवर छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे २२३ मेट्रीक टन कागद वापरण्यात आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षा पुढील काळात डिजिटल पध्दतीने घेतल्या जातील असे सुतोवाच राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले.मात्र, ही परीक्षा कशी घेतली जाईल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही.परंतु, परीक्षेसाठी लागणारा कागद विचारात घेता या परीक्षा डिजिटल स्वरूपात घ्याव्या लागतील,असे कुलकर्णी यांनी पत्रकार स्पष्ट केले.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुलकर्णी म्हणाले, इयत्ता बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छपाईसाठी १० कोटी ७२ लाख ८० हजार ३६० पृष्ठे व नमूना उत्तरपत्रिकांसाठी १९ लाख २९ हजार ३८० पृष्ठे अशी एकूण १० कोटी ९२ लाख ०९ हजार ७४० पृष्ठांवर छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे २२३ मेट्रीक टन कागद वापरण्यात आला. तसेच १०६५६००० एवढ्या उत्तरपत्रिकांची छपाई करण्यात आली असून त्यासाठी अंदाजे १७०० मेट्रीक टन कागद वापरण्यात आला.

कुलकर्णी म्हणाले,परीक्षेसाठी लागणारा कागद हा झाडांपासून तयार होतो.त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता पुढील काळात बोर्डाच्या परीक्षा या डिजिटल पध्दतीने घ्याव्या लागतील. तेव्हाच कागदाचा वापर कमी होईल.
दरम्यान कुलकर्णी म्हणाले, इयत्ता १२ वी परीक्षेसाठी प्रचलित पध्दतीने गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता या परीक्षेपासून गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्रित छपाई करुन देण्यात येणार आहे. तसेच प्रचलित पध्दतीमध्ये गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव छपाई करताना प्रथम आडनाव, विद्यार्थ्यांचे नाव व वडिलांचे नाव याप्रमाणे छपाई करण्यात येत होती. सदर परीक्षेपासून प्रथम विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव याप्रमाणे छपाई करण्यात येणार आहे.
त्याचाप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी पुणे विभागातील बारामती तालुक्यामध्ये असलेल्या इ.१० वी व इ.१२ परीक्षा केंद्रावर परिरक्षक केंद्र (Custody) ते परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका सुरक्षितरित्या पोहचविण्यासाठी Gps Enabled Digital Lock With Trunk चा वापर प्रायोगिक तत्वावर यशस्वीरित्या करण्यात आला.त्याचा वापर राज्य भरात करता येईल का? या दृष्टीने पुढील काळात निर्णय घातला जाईल,असेही कुलकर्णी यांनी सांगितले.