11 th Admission: ऑनलाईन अर्ज भरूनही 3 लाख 33 हजार विद्यार्थ्यांना का नाही मिळाला प्रवेश?
शुक्रवारी प्रवेश प्रक्रियेची पहिली नियमित फेरी मधील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यातून 5 लाख 74 हजार 943 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र प्रवेश अर्ज भरूनही 3 लाख 33 हजार 461 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आले नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून शुक्रवारी प्रवेश प्रक्रियेची पहिल्या नियमित फेरी मधील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यातून 5 लाख 74 हजार 943 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र प्रवेश अर्ज भरूनही 3 लाख 33 हजार 461 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच चिंतेचे वातावरण आहे. परंतु या फेरीत प्रवेश मिळाला नसला तरी पुढील फेरीमध्ये अर्ज करू करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला मिळालेले गुण आणि पसंतीक्रम निवडत असलेल्या महाविद्यालयांचा कट ऑफ पाहणे गरजेचे आहे.
शिक्षण विभागातर्फे 3 लाख 23 हजार 413 विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेसाठी 1 लाख 26 हजार 90 विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेसाठी तर एक लाख 25 हजार 412 विद्यार्थ्यांना कला शाखेसाठी कॉलेज अलॉट करण्यात आले. कॉलेज अलॉट केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाचे सर्वाधिक 5 लाख 26 हजार 161 विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील सर्वाधिक 1 लाख 33 हजार 323 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले तर पुणे विभागातील एक लाख 9 हजार 622 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज अलॉट झाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला इयत्ता दहावी मध्ये मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे कट ऑफ याचा विचार करून दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम पुन्हा नोंदवण्याचे आहे. नामांकित महाविद्यालयामध्ये सर्वच विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात त्यामुळे संबंधित कॉलेजचा कट ऑफ जास्त असतो. परिणामी दहावीत कमी टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागील वर्षी ज्या कॉलेजचा कटऑफ आपल्याला मिळालेल्या गुणा एवढा आहे, अशा कॉलेजचे पसंतीक्रम निवडावेत.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोट्यातून म्हणजेच केंद्रीय, अल्पसंख्यांक, इन हाऊस व्यवस्थापन अशा कोट्यातून प्रवेश निश्चित केलेला असल्यास संबंधित विद्यार्थी पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो.
मुंबईचा विचार केला तर दोन लाख 18 हजार 205 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता. मात्र मुंबई विभागातील एक लाख 33 हजार 332 विद्यार्थ्यांनाच कॉलेज अलॉट झाले आहे. पुणे विभागातील प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरलेल्या एक लाख 68 हजार 749 विद्यार्थ्यांपैकी १ लाख 9 हजार 622 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.