सीईटी-परीक्षा डिसेंबर 2026 मध्येच; यंदा लवकर परीक्षा घेण्याचे नियोजन

पुढील वर्षी सीईटी अधिक लवकर घेण्याचे नियोजन आहे. डिसेंबर 15 ते जानेवारी 15 या कालावधीत पहिली सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.पहिला अटेंम्ट डिसेंबर महिन्यातच घेतला जाईल.

सीईटी-परीक्षा डिसेंबर 2026 मध्येच; यंदा लवकर परीक्षा घेण्याचे नियोजन
CET Cell Commissioner Dilip Sardesai addresses the media regarding the Maharashtra CET exam schedule, announcing plans to conduct the CET 2026 examination in December for the 2027-28 academic year admissions.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा लवकर आयोजित करून या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी-सेल तर्फे विविध व्यवसायीक अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी सीईटी परीक्षा लवकर घेतली जाणार आहे.त्यादृष्टीने सीईटी-सेलतर्फे नियोजन केले जात असून 2027-28 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी घेतली जाणारी सीईटी- परीक्षा ही डिसेंबर 2026 मध्येच आयोजित केली जाणार आहे,असे सीईटी-सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. 

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे वर्षातून दोन वेळा सीईटी परीक्षा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली.त्यानुसार यंदा दोन सीईटी परीक्षा घेण्यात आल्या.पहिली सीईटी परीक्षा झाल्यानंतर सध्या दुसऱ्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे.पहिल्या सीईटी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असून दुसऱ्या सीईटी परीक्षेचा निकाल 25 जून पूर्वी प्रसिद्ध केला जाईल. असेही सरदेसाई सांगितले.

सारदेसाई म्हणाले, पुढील वर्षी सीईटी अधिक लवकर घेण्याचे नियोजन आहे. डिसेंबर 15 ते जानेवारी 15 या कालावधीत पहिली सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.पहिला अटेंम्ट डिसेंबर महिन्यातच घेतला जाईल.

काही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा न घेता एकच सीईटी परीक्षा घेण्यात येईल. बीएड , बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांसाठी एकच परीक्षा असेल.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सीईटी-सेल कडून असे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

या वर्षांपासूनच सीईटी- सेलकडून  प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अडचणीबाबत वियार्थी सहाय्यता केंद्र स्थापन केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात 2 नागपूरमध्ये 2 , मुंबई व परिसरात एकूण चार ते 5 विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू केले जातील. हे सर्व केंद्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतील. तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करतील, असेही सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.