बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केव्हा; बोर्डाने केले स्पष्ट

राज्य मंडळाने परिपत्रक प्रसिद्ध करून राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 16 मे रोजी गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केव्हा; बोर्डाने केले स्पष्ट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (12 th) परीक्षेचा ऑनलाईन निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना निकालाच्या मूळ गुणपत्रिकांचे वितरण (Distribution of original mark sheets)केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत येत्या शुक्रवारी 16 मे रोजी दुपारी 3 वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/ मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 5 मे रोजी जाहीर केला होता. त्यानंतर लवकरच गुणपत्रिकांचे वितरण केव्हा केले जाईल, याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार राज्य मंडळाने परिपत्रक प्रसिद्ध करून राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 16 मे रोजी गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

इयत्ता बारावीच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना 16 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करावे, अशा सूचना बोर्डातर्फे देण्यात आले आहे.