लोणावळ्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी; पुण्याचे काय? 

लोणावळा नगरपरिषदेने लोणावळा परिसरातील सर्व माध्यमाच्या शाळांना २० व २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र,अद्याप पुण्यातील शाळांना सुट्टी देण्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

लोणावळ्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी; पुण्याचे काय? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यासह कोकण परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यातच आता लोणावळा नगरपरिषदेने लोणावळा परिसरातील सर्व माध्यमाच्या शाळांना २० व २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, पुण्यातील केवळ घाट माथ्यावरील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अशोक साबळे यांनी शाळांना सुट्टी देण्यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. रायगड, ठाणे,पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा शहर व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोणावळा शहर परिसरामध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाऊस व वाहणारे पाणी या बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून लोणावळा नगरपरिषदेतील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या बुधवारी व गुरुवारी अनुक्रमे  20 व 21 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी असणार आहे. परंतु, संबंधित शिक्षक व कर्मचारी यांनी शाळेतील सर्व कागदपत्रे सुरक्षित व व्यवस्थित राहतील याची दक्षता घ्यावी सुट्टीच्या कालावधीतील अध्ययनाचे कामकाज इतर दिवशी पूर्ण करावे.
  पुण्यातील शिक्षण अधिकारी यांनी लोणावळा येथील शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात लोणावळा नगरपरिषदेला दूरध्वनी द्वारे सूचना दिल्या.त्यानंतर सुट्टीचे आदेश देण्यात आले.मात्र, तर पुण्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळाशी, आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 

दरम्यान, १९ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. आपत्ती अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व शाळा /महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त उर्वरीत कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडणेबाबत कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेणेबाबत कार्यालयप्रमुखांना निर्देशित करण्यात आले. येत्या  दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत आज संध्याकाळपर्यंत पावसाच्या अंदाजानुसार निर्णय घेण्यात येईल,असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.