तृतीय वर्षातील तब्बल ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना देण्याचे आव्हान

स्वायत्त महाविद्यालयांच्या तुलनेत संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्या मोठी असल्याने आता एकाच वेळी ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

तृतीय वर्षातील तब्बल ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना देण्याचे आव्हान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीनंतर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षातील तब्बल ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान उच्च शिक्षण संचालनालयासमोर उभे राहिले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आता प्राध्यापकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे (एमएसएफडीए) कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पदवी स्तरावरच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योग, संस्था, व्यावसायिक किंवा विविध क्षेत्रांत कार्यप्रशिक्षण घेणे तसेच संशोधनाचा अनुभव मिळविणे अपेक्षित आहे. नव्या पदवी अभ्यासक्रमाची रचना चार वर्षांची असून, तिसऱ्या वर्षानंतर पदवी मिळण्याची तरतूद आहे. चौथे वर्ष संशोधनासाठी असून, तिसऱ्या वर्षाच्या सहाव्या सत्रात विद्यार्थ्यांनी कार्यप्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या कार्यप्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांकही मिळणार आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरुवातीला राज्यातील १५० हून अधिक स्वायत्त महाविद्यालयांमध्ये करण्यात आली. त्यानंतर संलग्न महाविद्यालयांमध्येही नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू झाला. स्वायत्त महाविद्यालयांच्या तुलनेत संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्या मोठी असल्याने आता एकाच वेळी ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यात ग्रामीण भागातील महाविद्यालयांसमोर हे आव्हान अधिक गंभीर आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये कोणत्या प्रकारच्या कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याचा अहवाल प्राध्यापकांच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. या अहवालांचे संकलन करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून, त्याचा उपयोग इतर महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी शोधण्यासाठी होणार आहे.

विद्यार्थी व्यावसायिक, उद्योजक, संस्था, कंपन्या किंवा अन्य संबंधित आस्थापनांमध्ये कार्यप्रशिक्षण पूर्ण करू शकतील. त्यानंतर त्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना श्रेयांक मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासोबतच त्यांच्या रोजगारक्षमतेतही वाढ होईल, असे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.

२० हजारांहून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण

प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था ही देशातील एकमेव अशा प्रकारची संस्था असल्याचे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले. संस्थेमध्ये बहुविषयक अभ्यासक्रम व अध्यापन केंद्र, नेतृत्व विकास केंद्र, समावेशकता व विविधता केंद्र, नवोपक्रम व अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र, संसाधन केंद्र तसेच मूल्यमापन व मूल्यांकन केंद्रांचा समावेश आहे.

संस्था स्थापन झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत राज्यातील २० हजारांहून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नेतृत्वगुण, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय शिक्षण यांसह विविध विषयांवर हे प्रशिक्षण देण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार संस्थेमार्फत प्राध्यापकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येत असल्याचे डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले.