शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासोबतच मिळणार टॅब
यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ९० कोटी रुपये खर्च करणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सुट्या संपत आल्या की, विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण होते. मग शाळेच्या पहिल्या दिवशी जर शैक्षणिक साहित्य (Educational materials) विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यांचा आनंदही द्विगुणीत होतो म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये (Mumbai Municipal Corporation schools) शिक्षण घेणाऱ्या तब्बल साडेतीन लाख विद्यार्थ्यांना (students) शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
या साहित्यामध्ये शालेय गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ९० कोटी रुपये खर्च करणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक साहित्य मोफत वितरीत करण्याचा उपक्रम राबवत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठलाही अडथळा येऊ नये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
आता बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार आहे. पालिकेकडून सर्व शाळांमध्ये हे साहित्य पोहोचवण्यात येत आहे. शाळानिहाय वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना देणार टॅब
इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या अभ्यासासह आधुनिक पद्धतीचाही सराव व्हावा, तंत्रज्ञानाची माहिती अवगत व्हावी म्हणून शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देण्यात येणार असून या टॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. टॅब कसा हाताळावा, त्याचा अभ्यासात उपयोग कसा करावा, याबाबत शिक्षकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.