विद्यार्थ्यांनी हिंदीसह अधिकाधिक भाषा शिकाव्या: राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
कौशल्य विद्यापीठाच्या युवा विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, युवकांना जपानला जायचे असेल तर अगोदर जपानी भाषा शिकून घ्यावी, जर्मनीला जायचे असेल तर जर्मन भाषा शिकावी. त्यामुळे नोकरी व्यवसाय करणे सुलभ होते,असेही त्यांनी सांगितले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जगातील अनेक देश आज आपल्या कुशल कार्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत. मात्र, अनेक देशात नोकरीसाठी तेथील भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा वयातच अधिकाधिक अधिक भाषा शिकाव्या तसेच जर्मन, जपानी, इटालियन, फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा शिकावी, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा (Ratan Tata Maharashtra State Skill University) वर्धापन दिन सप्ताह विद्यापीठाच्या मुंबई येथील मुख्यालयात शनिवारी (दि. १९) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
आपण अशा राज्यातून येतो जेथे दुसरी भाषा शिकण्यास विरोध केला जात आहे. मात्र,देशात हिंदी भाषा येणे आवश्यक आहे, असे सांगून आपणाला स्वतःला हिंदी भाषा येत नाही याची खंत वाटते, असे राज्यपालांनी सांगितले. हिंदी भाषा बोलता आली, तर आपण गोर-गरीब जनतेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो, असे सांगून जनसामान्यांच्या भावना जोवर समजून घेत नाही तोवर चांगला नेता होता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विद्यापीठाच्या युवा विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, युवकांना जपानला जायचे असेल तर अगोदर जपानी भाषा शिकून घ्यावी, जर्मनीला जायचे असेल तर जर्मन भाषा शिकावी. त्यामुळे नोकरी व्यवसाय करणे सुलभ होते,असेही त्यांनी सांगितले.
जर्मनीमध्ये दंतवैद्यकाची अपॉइंटमेंट मिळण्याकरिता सहा सहा महिने थांबावे लागते. याकरिता आपल्या डॉक्टरांनी विदेशी भाषा शिकाव्या, असे सांगून आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंना जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा शिकण्यास वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. लहान वयात भाषा शिकल्यास ती मोठेपणी संपदा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.
जगात आज बिगर कुशल कामगारांची देखील गरज असल्याचे सांगून इटलीच्या राजदूतांनी इटलीमध्ये द्राक्षे तोडण्यास कामगार हवे आहेत. बिगर कुशल कामगारांना देखील विद्यापीठाने कौशल्य शिक्षण द्यावे,अशी सूचना राज्यपालांनी केली. भारतातील लोक इतर देशात काम करताना तेथील संस्कृती - कार्यपद्धतीशी लवकर जुळवून घेतात. तसेच आपल्या देशात करतात त्यापेक्षाही अधिक चांगले काम करतात असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विभागाशी निगडित विद्यापीठाला भेट देऊन राज्यपालांनी युवकांना तसेच शिक्षक व बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांचे आभार मानले. कार्यक्रमाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम, कौशल्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, कौशल्य विकास आयुक्त नितीन पाटील, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक माधुरी सरदेशकर, मुंबईतील जपानचे कॉन्सुल जनरल यागी कोजी, माजी कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.