NTAचं मोठं पाऊल, NEET परीक्षा 'नीट' होईपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये

एनटीएच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ, त्यांचे मॉडरेशन करणारे आणि विविध भाषांमध्ये भाषांतर करणारे सर्वजण गुप्त ठिकाणी पूर्ण लॉकडाउनमध्ये ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा संपेपर्यंत त्यांना बाहेरील जगाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्यास परवानगी दिलेली नाही.

NTAचं मोठं पाऊल, NEET परीक्षा 'नीट' होईपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

युजी-नीट २०२६ (NEET-UG 2026) परीक्षेतील पेपर लीक प्रकरणानंतर मोठा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर आता शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) यांनी २१ जून रोजी होणाऱ्या पुन्हा परीक्षेसाठी अभूतपूर्व आणि अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संपूर्ण प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रिया ‘नो लीक’ मोडमध्ये ('No-leak' mode) राबवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच परीक्षेशी संबंधित असलेल्या सर्वांना परीक्षा व्यवस्थित होईपर्यंत लॉकडाउनमध्ये (Lockdown) ठेवण्यात येणार आहे. 

एनटीएच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ, त्यांचे मॉडरेशन करणारे आणि विविध भाषांमध्ये भाषांतर करणारे सर्वजण गुप्त ठिकाणी पूर्ण लॉकडाउनमध्ये ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा संपेपर्यंत त्यांना बाहेरील जगाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी मोबाईल फोन, लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन, स्मार्टवॉच आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फक्त कडक सुरक्षा कर्मचारी आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा यांना प्रवेश देण्यात येणार आहे. 

प्रश्नपत्रिका लीक होण्याची शक्यता पूर्णपणे संपवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये विभागण्यात आली आहे. कोणत्याही एका व्यक्तीकडे संपूर्ण प्रश्नपत्रिका किंवा उत्तराची माहिती एकवटलेली नसेल. प्रत्येक टप्पा वेगळ्या टीमद्वारे हाताळला जाईल आणि शेवटच्या टप्प्यातच सर्व काही एकत्र केले जाईल. सर्वात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांची मदत घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून ही पावले उचलली जात असून, विमानांद्वारे प्रश्नपत्रिकांच्या सीलबंद पाकिटांचे वितरण केले जाईल. प्रत्येक केंद्रावर कडक सुरक्षा तपासणी, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही निगरानी आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक जॅमिंग यंत्रणा लावण्यात येणार आहे.

या पुर्नपरीक्षेमध्ये २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. एनटीएने विद्यार्थ्यांना आणि पालकांना आश्वासन दिले आहे की, यावेळी कोणत्याही प्रकारची गैरप्रकाराची शक्यता राहणार नाही. पेपर लीक प्रकरणानंतर निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणात ही ‘आयरन शील’ सुरक्षा व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षणमंत्री यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे संरक्षण करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.” पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. एनटीएने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.