मुंबई विद्यापीठ : ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात? 'या' कारणामुळे प्रवेश रद्दचा इशारा..
विद्यापीठाने दिलेल्या मुदतीमध्ये महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा न केल्वियामुळे विद्यापीठ प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. संबंधित महाविद्यालयांनी महिनाभरात सर्व कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर न केल्यास सदरील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठ (Mumbai University) संलग्न महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश (Admission to undergraduate and postgraduate courses) घेतलेल्या तब्बल ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात (Admission of 97 thousand students cancelled) आले आहेत. विद्यापीठाने दिलेल्या मुदतीमध्ये महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा न केल्यामुळे विद्यापीठ प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. संबंधित महाविद्यालयांनी महिनाभरात सर्व कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर न केल्यास सदरील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा कडक इशारा दिला आहे.
महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केली असून, पुढील एका महिन्यात कागदपत्रे सादर केली नाही, तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील, तसेच या कॉलेजांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे. त्यामुळे ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबतची, तसेच त्यांची नाव नोंदणी आणि पात्रतेबाबतची कागदपत्रे कॉलेजांनी त्याच शैक्षणिक वर्षात विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक असते. मात्र, अनेक कॉलेजांकडून ही कागदपत्रे सादर करण्यात टाळाटाळ केली जात आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजेसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्रे ८ दिवसांत विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन विद्यापीठाने गेल्या महिन्यात केले होते. ही मुदत संपल्यानंतर अनेक कॉलेजांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यातून विद्यापीठाने या कॉलेजांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ अशा चार वर्षांत कागदपत्रे सादर न केलेल्या कॉलेजांचा समावेश आहे. आता विद्यापीठाने या कॉलेजांना कागदपत्रे सादर करण्यासाठी पुन्हा एकदा एका महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत आवश्यक कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर करणार नाहीत त्या कॉलेजांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणार असून, संबंधित कॉलेजांना पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी नाकारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.