65 लाखांहून अधिक विदयार्थी झाले दहावी आणि बारावीत नापास

राष्ट्रीय बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाचे अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

65 लाखांहून अधिक विदयार्थी झाले दहावी आणि बारावीत नापास

एज्युवार्ता न्युज नेटवर्क 

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 65 लाखांहून अधिक विद्यार्थी (Students) इयत्ता 10वी (10th Board) आणि 12वी (12th Board) बोर्डाची परीक्षा (Exams Results) उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. 

शिक्षण मंत्रालयाने (Education ministry) एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे की, मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेत अयशस्वी ठरले आहेत. यामध्ये राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यात एमपी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात वाईट लागल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

मीडिया रीपोर्टनुसार,या विश्लेषणामध्ये ज्या मंडळांचे इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये 59 स्कूल बोर्ड, 56 राज्य मंडळे आणि 3 राष्ट्रीय मंडळे यांच्याशी संलग्नित शाळांचा समावेश आहे.याच अहवालात गेल्या वर्षी ६५ लाखांहून अधिक मुले बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी ठरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मीडिया रीपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या अहवालाच्या माहितीनुसार,या अहवालात दहावीचे सुमारे ३३.५ लाख विद्यार्थी पुढील इयत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत,तर 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही.28 लाख विद्यार्थी नापास झाले. तसेच सुमारे 32.4 लाख विद्यार्थी 12वीची परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. तर  5.2 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि 27.2 लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

राष्ट्रीय बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाचे अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय बोर्डाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६ टक्के होती, तर राज्य मंडळाचे १६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 

10 वीमध्ये सर्वाधिक मुले एमपी बोर्डातून नापास झाली, दुसऱ्या क्रमांकावर बिहार बोर्ड आणि तिसऱ्या क्रमांकावर यूपी बोर्ड आहे. बारावीत उत्तर प्रदेश बोर्डात सर्वाधिक मुले नापास झाली आणि त्यानंतर मध्य प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो.