परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर 'माठ'; मनविसे TET पेपर फुटीवर आक्रमक,कार्यालयाचे कामकाज बंद? 

धनंजय दळवी म्हणाले, “आज आम्ही खुर्ची खाली आणली आहे; उद्या गरज पडल्यास परीक्षा परिषदेचे कार्यालय बंद पाडू, कामकाज ठप्प करू. मुख्य सूत्रधारांना अटक आणि दादा भुसे यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”

परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर 'माठ'; मनविसे TET पेपर फुटीवर आक्रमक,कार्यालयाचे कामकाज बंद? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

TET पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या खुर्चीला हात घातला. अध्यक्षांची खुर्ची थेट दालनाबाहेर खेचून चौथ्या मजल्यावरून खाली आणण्यात आली. त्यानंतर त्या खुर्चीवर ‘माठ’ ठेवत शासन-प्रशासनाच्या निष्क्रियतेचा, नाकर्तेपणाचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच परीक्षा परिषदेच्या कार्यालयावरील फलकाला काळे फासण्यात आले.

राज्यात TET, तलाठी भरती, पोलीस भरतीसह अनेक परीक्षांमध्ये झालेल्या पेपर फुटीमागे केवळ दलाल नव्हे, तर मंत्रालयापासून परीक्षा परिषदेपर्यंतची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे. केवळ प्याद्यांना अटक करून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी. तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मनविसेने केली.

TET पेपर फूटी प्रकरणी विविध संघटना आक्रमक झाल्या असून राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली जात आहेत. समोवारी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी सुरूवातीला कार्यालयाच्या गेट बाहेर आंदोलन केले.त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत  कार्यालयात प्रवेश केला. राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष व परीक्षा परिषद आयुक्त दोघेही कार्यालयात नसल्याने कार्यकर्त्यांनी थेट अध्यक्षांची खुर्ची उचलून कार्यालयाबाहेर आणली. तसेच त्यावर माठ ठेऊन जोरदार घोषणा दिल्या.

मनविसे पुणे शहराध्यक्ष धनंजय दळवी म्हणाले, “आज आम्ही खुर्ची खाली आणली आहे; उद्या गरज पडल्यास परीक्षा परिषदेचे कार्यालय बंद पाडू, कामकाज ठप्प करू. मुख्य सूत्रधारांना अटक आणि दादा भुसे यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”

या आंदोलनात अभिषेक थिटे, सारंग सराफ, परीक्षित शिरोळे, केतन डोंगरे, अशोक पवार, निलेश जोरी, शशांक अमराळे, हेमंत बोळगे, कुलदीप घोडके, मयुर शेवाळे, ऋषी जाधव, कृणाल पायगुडे, तेजस उमाप, सुमित बनके, विजय बोरकर, प्रणव हुले, अर्पित इंगवले, दर्शन रोवतू, अभय रास्ते, गणेश होळकर, स्वप्नील नाईक, प्रज्वल सरोदे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.