कोकरोच जनता पार्टीकडून शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहेत घोषणा? जाणून घ्या..
पेपर लीक झाल्यावर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्यांना10,000 रुपये सरकारने द्यावेत. जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 प्रति महिना द्यावे. 72 तासांच्या आत बॅकचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांच्या उपस्थित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) प्रचंड मोठे असे आंदोलन पार पडले. यावेळी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांच्यासह शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या आंदोलनात दिपके यांच्याकडून शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध (Education Manifesto Released) करण्यात आला आहे. सध्या देशात परीक्षांसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटी झाल्यावर काय केले पाहिजे, यावर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जाहीरनाम्यात काय?
पेपर लीक झाल्यावर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्यांना10,000 रुपये सरकारने द्यावेत. जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 प्रति महिना द्यावे. 72 तासांच्या आत बॅकचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे. हाताने लिहिलेले पेपर हातानेच चेक करावेत. पेपर ऑनलाईन चेक करू नयेत. परीक्षेच्या सहा दिवस आधी कम्प्युटर ॲाडिट झालं पाहिजे. एनसीईआरटी ने जो नकाशा काढलाय पुस्तकात तो वापस घेतला पाहिजे, अशा प्रमुख घोषणा करण्यात आल्या आहेत.
यावेळी आंदोलनस्थळी आंदोलक 'इन्कलाब जिंदाबाद', 'कॉक्रोच मांगे रेज्गिनेशन'च्या घोषणा देत होते. अनेकांनी झुरळाचे चित्र असलेले मास्क घातले होते. विद्यार्थ्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. नीट, सीबीएसईसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमुळे देशातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात असल्याचे दिपके म्हणाले.
सरकारला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देईपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत, हा देश आंदोलनातूनच घडला आहे. अभिजित दिपके यांच्याकडून सरकारला उद्या शनिवार दि. १३ जूनपर्यंत शिक्षणंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा पुढील आंदोलन २० जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होणार असून, त्यानंतर लखनौ, अमृतसर, जयपूर आणि बंगळुरू येथे आंदोलनाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.