अतिवृष्टीमुळे बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीची परीक्षा अर्ज भरण्यास येत्या 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, राज्य मंडळातर्फे संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC & HSC Board)इयत्ता बारावीची परीक्षा अर्ज भरण्यास येत्या 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, राज्य मंडळातर्फे संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यात मराठवाड्यासह नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य मंडळाने दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यास मदत वाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संवाद साधून परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 20 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध आहे. 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरू शकतात, असेही राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.