एलएलबीसाठी चुरस वाढणार! २९,२८८ विद्यार्थ्यांनी दिली CET परीक्षा
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेसाठी एकूण ३७ हजार १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७८.८५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ७ हजार ८५२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १२० परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित पद्धतीने घेण्यात आली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाच वर्षीय एकात्मिक एलएलबी (BA LLB 5 Year) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेला २९ हजार २८८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती (Attendance of 29,288 students) दर्शवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने यंदा प्रवेशासाठी चुरस वाढणार (Competition for admission) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेसाठी एकूण ३७ हजार १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७८.८५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ७ हजार ८५२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १२० परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्व परीक्षा सुरळीत पार पडली.
अधिकृत माहितीनुसार, मागील वर्षी २०२५-२६ मध्ये या परीक्षेसाठी ३५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि २७ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १ हजार ९१६ ने वाढ झाली आहे. बारावीनंतर थेट एलएलबीला प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत असल्याचे हे आकडे दर्शवतात.
बार काउन्सिल ऑफ इंडियानेही एलएलबी अभ्यासक्रमाला महत्त्व दिल्याने आणि वकील व्यवसायामधील संधी वाढल्याने विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. सीईटी गुणांवर आधारित मेरिटनुसार प्रवेश दिले जात असल्याने गुणवत्तेची स्पर्धा अधिक कडवी होणार आहे. सीईटी सेल लवकरच निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करणार असून, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट्स तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.