चंद्रपूर जिल्हा बँक भरती वादात, 'ईडी'द्वारे होणार चौकशी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांसाठी भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते मयूर राईकवार यांनी नवी दिल्ली गाठून सक्तवसुली संचालनालय (ED) कार्यालयात या प्रकरणाची तक्रार दाखल केली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (Chandrapur District Central Cooperative Bank Recruitment) ३५८ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. मात्र, ही प्रकिया सुरुवातीपासून ते परीक्षेच्या दिवसापर्यंत वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आमदार किशोर जोरगेवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात या भरती प्रक्रियेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते मयूर राईकवार (AAP leader Mayur Raikwar) यांनी नवी दिल्ली गाठून सक्तवसुली संचालनालय (ED) कार्यालयात या प्रकरणाची तक्रार दाखल केली.
बँकेतील भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (एससी, एसटी, ओबीसी व महिला) आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. ३१ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली. याशिवाय निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही या तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.
यासंदर्भात आपच्या शिष्टमंडळाने 'ईडी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक पार पडावी. चंद्रपूरच्या सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्धवस्त करण्याचा डाव आहे. भरतीप्रक्रियेची चौकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्यात येणार आहे. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील मयूर राईकवार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत दिल्यानंतर भाजप नेते मनोज पोतराजे यांनी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन उपोषणाची सांगता केली. पोतराजे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला व सविस्तर चर्चा केली. तसेच नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भरती प्रक्रियेत जी अनियमितता झाली, त्याचीही चौकशी होईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले, असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
