राज्यात लवकरच प्राध्यापक भरती; उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती
सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाने या प्रस्तावावरील काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या असून त्या लवकरच पूर्ण करून भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील प्राध्यापक भरतीचा (Assistant Professor Recruitment) प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच वरमावर बोट ठेवून विरोधी पक्षातील आमदार विधान परिषदेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ४ हजार ४३५ रिक्त सहायक प्राध्यापक पदांच्या (Vacant Assistant Professor Posts) भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाने या प्रस्तावावरील काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या असून त्या लवकरच पूर्ण करून भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील सार्वजनिक ११ विद्यापीठे आणि १ हजार १७२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ७६३ पदे मंजूर आहेत. त्यातील २१ हजार २३६ पदांवर प्राध्यापक कार्यरत असून तब्बल १२ हजार ५२७ सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे 'NEP' ची अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर 'नॅक'ला समोरे जाणे यासाठी १०० टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजेत. प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने महाविद्यालयांना मोठी अडचण निर्माण होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध होण्यासाठी प्राध्यापकांची भरती होणे आवश्यक आहे. सध्या प्रत्येक महाविद्यालयात जवळपास ४० टक्के रिक्त पदे आहेत. सेट, नेट, पी.एचडी धारकांच्या बेरोजगारीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे या जागा भरल्या जाणार जाणार आहेत का? आणि किती कालावधीत भरल्या जाणार आहेत, असा प्रश्न पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे काँग्रेस आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना इंद्रनील नाईक म्हणाले, प्रा. आसगावकर यांनी मांडलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्राध्यापक भरती संदर्भात शासन स्तरावर काही प्रक्रिया चालू आहेत. प्राध्यापक भरतीचा विषय आपण आधीच मांडलेला आहे. हा विषय वित्त विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. त्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे वित्त विभागाकडून कळवण्यात आले आहे. त्या त्रुटी पण लवकरात लवकर दूर करण्यात येईल, आणि प्राध्यापक भरती लवकर सुरळीत चालू होईल.
ही लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी मांडली होती. तसेच सदस्य सत्यजित तांबे, विक्रम काळे आणि अभिजीत वंजारी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. राज्यात उच्च शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्यामुळे, या भरती प्रक्रियेला वेग मिळाल्यास अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.