मोठा निर्णय; मृदा व जलसंधारण विभागातील 650 पदांसाठीची फेर परीक्षा
TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रावर १४, १५, १६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मृदा व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) गट-ब संवर्गातील ६५० पदांसाठीची फेरपरीक्षा (reexamination) घेण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षा पारदर्शक व्हावी, या अनुशंगाने ७ शहरातील १० टिलीएस-आयओएन कंपनीच्या (Tillis-ion Company) अधिकृत केंद्रावरच ही परीक्षा घेतली जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांनी दिल्या आहेत.
TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रावर १४, १५, १६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. घटनेची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात आणि राज्यात सध्या नीट परीक्षेवरून गोंधळ सुरु आहे. नेट-यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यात आता राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेमध्ये देखील गैरप्रकार झाला होता. त्यामुळे यापुढे तरी परिक्षांमध्ये गैरप्रकार होणार नाही, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.