मुख्याध्यापक संजय राठोडचे काळे कारनामे, मुलाला दहावीत जास्त गुण मिळण्यासाठी 24 जणांना लावले कामाला, गुन्हा दाखल

शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. एका विद्यार्थ्याच्या यशासाठी संपूर्ण परीक्षा यंत्रणेचा दुरुपयोग करणे आणि २४ जणांच्या कारकीर्दीला ग्रहण लावणे, यामुळे शैक्षणिक नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मुख्याध्यापक संजय राठोडचे काळे कारनामे, मुलाला दहावीत  जास्त गुण मिळण्यासाठी 24 जणांना लावले कामाला, गुन्हा दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दहावी बोर्ड परीक्षेत (10th Board Examination) भुईबावडा परीक्षा केंद्रावर (Bhuibavda Examination Centre) घडलेल्या गंभीर कॉपी प्रकरणात (Copy case) कोकण विभागीय मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय राठोड (Headmaster Sanjay Rathod) असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून, त्यांच्यासह एकूण २४ जणांवर विभागीय कारवाई (Action taken against 24 people) करण्याचे आदेश कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिले आहेत. यातील तीन जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चौकशी अहवालानुसार, वैभववाडी तालुक्यातील आदर्श विद्यामंदिर, भुईबावडा येथील परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार घडले नाही. मात्र, एकाच विद्यार्थ्याच्या पाचही विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये मुद्दाम फेरफार करण्यासाठी केंद्रावरील संपूर्ण यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. या गैरप्रकारात केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, रिलीवर पर्यवेक्षक, स्टेशनरी सुपरवायझरसह इतर कर्मचारी यांचा सहभाग आढळला.

या प्रकरणातील मुख्य दोषी हे संबंधित विद्यार्थ्याचे पालक आणि उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड आहेत. आपल्या पाल्याला अधिक गुण मिळावेत या हव्यासापोटी त्यांनी परीक्षा केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रभावित केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासोबत पर्यवेक्षक संजय कुमार आडे आणि उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहिणारी एक अज्ञात व्यक्ती यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. एका विद्यार्थ्याच्या यशासाठी संपूर्ण परीक्षा यंत्रणेचा दुरुपयोग करणे आणि २४ जणांच्या कारकीर्दीला ग्रहण लावणे, यामुळे शैक्षणिक नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेनंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींमध्ये एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे विभागीय मंडळाच्या कठोर कारवाईचे स्वागत केले जात आहे.

कोकण विभागीय मंडळाने याप्रकरणी अतिशय वेगाने आणि पारदर्शकपणे चौकशी पूर्ण केली. यामुळे परीक्षा पद्धतीतील कमकुवतपणा आणि दबावाखाली यंत्रणा कशी काम करते, याकडे लक्ष वेधले गेले आहे. शिक्षण विभागाने अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी कठोर नियमावली आणि सतत मॉनिटरिंग यंत्रणा मजबूत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे दहावी बोर्ड परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका घेतली जात असून, पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यातील यशासाठी अशा गैरमार्गांचा अवलंब करणे किती घातक ठरू शकते, याचा इशारा या घटनेने दिला आहे. सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कारवाईची चर्चा रंगली असून, यामुळे इतर केंद्रांवरही सतर्कता वाढली आहे.