तब्बल 32 वर्षानंतर साताऱ्यात होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने पाच ते सात जून या दरम्यान साताऱ्यासह औदुंबर, इचलकरंजी आणि कोल्हापूरमधील संस्थांच्या प्रस्तावित स्थळांना भेटी दिल्या. ८ जून रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत साताऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्यात आला आणि त्यावर महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
यंदाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (All India Marathi Literature Conference) तब्बल 32 वर्षानंतर साताऱ्यात (satara) होणार आहे. त्यामुळे सातारकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. हा प्रतिष्ठेचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन (Maharashtra Sahitya Parishad, Shahupuri Branch and Mavla Foundation) यांना मिळाला असून पुण्यात (pune) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे साताऱ्यामधील साहित्यिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली यावेळी अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी देखील उपस्थित होते.
साताऱ्यात यापूर्वी 1993 सालामध्ये साहित्यिक विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे संमेलन पार पडले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा गेली बारा वर्षे संमेलनासाठी साताऱ्याच्या निवडीसाठी प्रयत्नशील होती. यावेळी साताऱ्याची निवड महामंडळाने केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने पाच ते सात जून या दरम्यान साताऱ्यासह औदुंबर, इचलकरंजी आणि कोल्हापूरमधील संस्थांच्या प्रस्तावित स्थळांना भेटी दिल्या. ८ जून रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत साताऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्यात आला आणि त्यावर महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, हे संमेलन साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे. मागील संमेलन देखील याच ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. साताऱ्यातील हे चौथे साहित्य संमेलन ठरणार आहे. यापूर्वी १९०५ मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर, १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ आणि १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलने पार पडली होती. संमेलनाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन समितीही स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये प्रा. मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे. या संमेलनाच्या निमित्ताने सातारा पुन्हा एकदा मराठी साहित्यविश्वाचे केंद्रस्थान ठरणार आहे.