हेच बाकी होतं! बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगितली भोंग्यातून उत्तरे, परीक्षा केंद्राची कडीचूप

सध्या राज्यभर दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. सरकारकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. मात्र, नांदेडच्या दहेली तांडा येथे हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

हेच बाकी होतं! बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगितली भोंग्यातून उत्तरे, परीक्षा केंद्राची कडीचूप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या राज्यभर दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा (Class 12th board exams) सुरू आहेत. सरकारकडून कॉपीमुक्त अभियान (Copy-free campaign) राबवले जात आहे. मात्र, नांदेडच्या दहेली तांडा (Daheli Tanda Examination Center) येथे हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. किनवट तालुक्यातील दहेली तांडा परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थांना भोंग्यावरून उत्तर सांगितल्याचा प्रकार उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र, इतिहासाच्या पेपरवेळी विद्यार्थ्याना बोंग्याद्वारे उत्तरे सांगण्यात आली. स्व. संगीतादेवी उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा (Sangeeta Devi Higher Secondary School Ashram School) येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. या प्रकरणावर परीक्षा केंद्राच्या संचालकांची कडीचूप पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, आता या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर शिक्षण मंडळाने प्रकरणात संस्थेकडून लेखी खुलासा मागितला आहे. संस्थेला नोटीस दिल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुपमा भंडारी यांनी दिली आहे. या परीक्षा केंद्राच्या भिंतीलगत प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे. या इमारतीरून अज्ञात व्यक्तीने भोग्यातून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे यावेळी सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र संचालक सुखदेव थोरात यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लागलीच सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

हा घडलेला सामूहिक कॉपी, मास कॉपीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने जी उत्तर सांगितली, ती प्रश्नपत्रिका पाहूनच सांगितली. ही प्रश्नपत्रिका त्या व्यक्तीला पुरवली कोणी, याबाबत मात्र अनेकांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे ही मिलीभगत कोणाच्या सहाय्याने करण्यात आली असा प्रश्न विचारल्या जात आहे. या परीक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा वावर असल्याचे म्हटले जात आहे. परीक्षा केंद्र संचालकांनी तक्रारीत ही बाब मांडली आहे.