आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू; २१ मे पासून मोफत मार्गदर्शन सत्रे

प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २१ मेपासून दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू; २१ मे पासून मोफत मार्गदर्शन सत्रे
Students attending an ITI admission guidance session to learn about vocational courses, skill development, and career opportunities in technical education.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयटीआय प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होते, यांची वाट पाहता होते. अखेर राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२६ सत्रासाठीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहितीपुस्तिका, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती येत्या २१ मे २०२६ पासून संकेतस्थळावरील ‘Download Section’ मध्ये पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना येत्या 1 जून पासून आयटीआय प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत.

प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २१ मेपासून दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरून त्याची पडताळणी व निश्चिती संबंधित अर्ज स्वीकृती केंद्रात करता येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी आयटीआय संस्था या प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येणार असून संस्थांमध्येही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवेश अर्ज शुल्क राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये, अराखीव प्रवर्गासाठी १५० रुपये, महाराष्ट्राबाहेरील उमेदवारांसाठी ३०० रुपये तर अनिवासी भारतीय (NRI) उमेदवारांसाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.अर्ज निश्चितीकरणासाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींचा संच संबंधित संस्थेत सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जातील माहितीची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांना ‘Application Confirmation Slip’ देण्यात येईल. अर्ज निश्चित करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर उमेदवारांना त्यामधील माहिती बदलता येणार नाही. मात्र प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर ‘हरकती नोंदविणे’ या टप्प्यात काही निवडक माहितीमध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक उमेदवाराने केवळ एकच अर्ज सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून, एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास संबंधित उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.

प्रत्येक प्रवेश फेरीतील निवडपत्र उमेदवारांच्या प्रवेश खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार असून, निवड झालेल्या संस्थेत वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहणार आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात त्रुटी आढळल्यास उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील तांत्रिक अडचणी किंवा शंका असल्यास उमेदवारांनी नजिकच्या आयटीआय संस्थेशी किंवा संबंधित जिल्हा व प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षाशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.