TET परीक्षा केंद्रांवर दुपट्टा, बुरखा, टोपी घालण्यास बंदी; परीक्षेपूर्वी 2 तास आधी हजर राहावे लागणार
सर्व परीक्षार्थींनी पेपर क्रमांक एक ला सकाळी साडेआठ वाजता व पेपर क्रमांक 2 ला साडेबारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. सकाळच्या सत्रातील पेपर 1 ला सकाळी दहा वाजून दहा मिनिटानंतर आणि पेपर क्रमांक दोन ला दुपारी दोन वाजून दहा मिनिटानंतर कुणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी,
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या 28 जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET परीक्षा) घेतली जाणार असून राज्यातील 6 लाख 125 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा परीक्षेदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून उमेदवारांना परीक्षा केंद्रात दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी या पैकी काहीही घालता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर, डिजिटल घड्याळ, पेन असे कोणतेही इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाता येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी केले आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे 37 जिल्ह्यातील 1729 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून 14 हजार 568 वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सर्व परीक्षार्थींनी पेपर क्रमांक एक ला सकाळी साडेआठ वाजता व पेपर क्रमांक 2 ला साडेबारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. सकाळच्या सत्रातील पेपर 1 ला सकाळी दहा वाजून दहा मिनिटानंतर आणि पेपर क्रमांक दोन ला दुपारी दोन वाजून दहा मिनिटानंतर कुणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थी ची हॅन्डबॅग मेटल डिटेक्टर च्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच बायोमेट्रिक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीचे फेस रिकॅग्निशन केले जाणार आहे. ओळखपत्राच्या मूळ डेटाबेसशी साधर्म असणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार आहे. काही वेळा मूळ डेटाबेसशी विद्यार्थ्यांचे फेस रेकग्निशन माहिती न जुळल्यास परीक्षा केंद्र संचालकांनी प्रत्यक्ष व्यक्ती त्याचे आय कार्ड ,प्रवेश पत्रावरील फोटो याची खातर जमा करून ओळख पटल्यानंतर त्या परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या सेवेत असणारे किती शिक्षक टीईटी परीक्षा देणार
राज्य परीक्षा परिषदेकडून प्रथमच सध्या सेवेत असणाऱ्या किती शिक्षकांनी टीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला आहे, याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यातील 40 हजार 83 शिक्षकांनी टीईटी पेपर क्रमांक एक साठी नोंदणी केली असून पेपर क्रमांक दोन साठी 66,181 शिक्षकांनी नोंदणी केली आहे. तर पेपर क्रमांक एक व दोन या दोन्ही पेपरसाठी एक लाख 19 हजार 999 शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे सध्या सेवेत असणारे एकूण 2 लाख 26 हजार 263 शिक्षक येत्या 28 जून रोजी टीईटी परीक्षा देणार आहेत.
उमेदवारांसाठी विशेष सूचना
परीक्षेला जाताना परीक्षार्थींनी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्राची मूळ व सत्य प्रत सोबत ठेवावी.
परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाता येणार नाही.
परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्हीचा अनिवार्यपणे वापर करण्यात येणार असल्यामुळे संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा यासाठी दुपट्टा बुरखा मास टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही.
गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी उत्तर पत्रिका ओ एम आर सोबत दोन कार्बन कॉपी असणार आहेत. एक कार्बन कॉपी उमेदवारांसाठी असेल व दुसरी कार्बन कॉपी परीक्षा परिषदेची असेल.
यावेळी प्रथमच प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक व क्यूआर कोड असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका ही कोणत्याही टप्प्यावर ओळखता येऊ शकेल.
परीक्षेमध्ये प्रत्यक्षात किती प्रश्न सोडवले याबाबतची संख्या उत्तर पत्रिकेमध्ये नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
गोपनीय साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाल्यापासून ते परीक्षा संपल्यानंतर कंट्रोल रूमला जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये होणार आहे.
सर्व परीक्षार्थींना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.
दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सूचना
ज्या दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घ्यावयाचा आहे. त्यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडून तशी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लेखनिक विकास सह शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालयास भेट द्यावी. लेखनिका बारावी पेक्षा जास्त शिकलेला नसावा व त्याचे वय 28 जून 2026 रोजी 19 वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य लेखनिक नसावा. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर लेखनिकास परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.