महाराष्ट्रात कुलगुरूंच्या राजीनाम्याचे सत्र सुरू? प्र- कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिला राजीनामा

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विद्यापीठ कायद्यात काही सुधारणा मांडल्या होत्या. त्यात प्र कुलगुरू यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भातील सुधारणा सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे ही सुधारणा सरवदे यांच्यासाठी केली होती का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

महाराष्ट्रात कुलगुरूंच्या राजीनाम्याचे सत्र सुरू? प्र- कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिला राजीनामा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे यांनी तडकाफडकी  राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात आता कुलगुरूंचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे काय ? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी २९ जानेवारी २०२४ रोजी डॉ.सरवदे यांची प्र.कुलगुरू पदी निवड केली होती. विद्यापीठ कायद्यात कुलगुरू यांचा पदभार पूर्ण झाल्यानंतर किंवा कुलगुरूंनी राजीनामा दिल्यानंतर प्र कुलगुरू यांचा कार्यकाल संपुष्टात येतो,अशी तरतूद होती. मात्र, तत्पूर्वी प्र कुलगुरूंना कार्यमुक्त करायचे असेल तर याबाबतची तरतूद कायद्यात नव्हती. परंतु, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी विद्यापीठ कायद्यात काही सुधारणा मांडल्या होत्या. त्यात प्र कुलगुरू यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भातील सुधारणा सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे ही सुधारणा सरवदे यांच्यासाठी केली होती का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

दरम्यान, डॉ. सरवदे यांनी प्र कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्या असून मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक पदी त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे नेमका त्यांनी राजीनामा का दिला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.